आम्ही गुजरातमध्ये सत्तेत आलो तर १० दिवसांत गुजरातमधील शेतक-यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.
राजकोट- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ उद्योजकांचे सुमारे १ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. पण आम्ही गुजरातमध्ये सत्तेत आलो तर १० दिवसांत गुजरातमधील शेतक-यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. तसेच ज्यांना कर्जाची गरज आहे, अशा लोकांना सहज कर्ज उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी गुजरातमधील राजकोट या भागाचा दौरा केला. राजकोटमधील सभेत राहुल गांधी म्हणाले, मोदींनी १५ उद्योजकांचे १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. कंपन्यांनी याचा लाभ सर्वसामान्यांना दिला का, तरुणांना रोजगार मिळाला नाही असा दावा त्यांनी केला.
गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १० दिवसांत कर्जमाफ करू असे आश्वासन त्यांनी शेतक-यांना दिले आहे. चीनला टक्कर देण्यासाठी काँग्रेस तीन गोष्टींवर भर देणार आहे.
आम्ही रागाने नव्हे तर छोटय़ा उद्योजकांना मदत करून आणि तरुणांना रोजगार देऊन चीनवर मात करू, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण आणि रोजगार हा प्रत्येक तरुणाचा अधिकार असून पाटीदार समाजाचा संघर्ष व्यर्थ ठरू देणार नाही. राज्यात काँग्रेस सरकार आल्यावर सर्वांना न्याय मिळवून देणार, असे त्यांनी सांगितले.