नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीतून ३० डिसेंबरनंतर देशवासीयांची पूर्णपणे सुटका होईल, अशा उठसूठ बाता मारणा-या पंतप्रधानांवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
राजस्थान- नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीतून ३० डिसेंबरनंतर देशवासीयांची पूर्णपणे सुटका होईल, अशा उठसूठ बाता मारणा-या पंतप्रधानांवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. ‘मोदीजी म्हणाले होते की, डिसेंबर ३० नंतर सर्व समस्या व अडचणी सुटतील. मात्र ही डोकेदुखी पुढील सहा ते सात महिने कायम राहणार असून त्याचा मोठा त्रास गरीब, कामगार आणि शेतकऱ्यांना होईल, अशी नाराजी राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
राजस्थानमधील बारन येथे आयोजित रॅलीत ते बोलत होते. नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणींतून देशवासीयांना ३० डिसेंबरनंतर दिलासा मिळेल, असे देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत. मात्र नोटाबंदीच्या निर्णयाला ३० डिसेंबर रोजी ५० दिवसांचा काळ लोटणार आहे. मात्र आजही बँकांसमोरील रांगा आणि सुट्टा पैशांसाठी कसरत करावी लागत आहे.
नोटाबंदीनंतर राजस्थानमधील गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी कोणतीही आश्वासक पावले केंद्रातील मोदी व राजस्थानातील वसुंधरा राजे सरकारने उचलेली नाहीत, अशी टीकाही राहुल यांनी केली. नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचारविरोधी नसून आर्थिक आणीबाणी निर्माण करणारा आहे. हा निर्णय काळया पैशांविरोधात नसून गरीब, शेतकरी, कामगार आणि महिलांविरोधी असल्याचे टीकास्त्र त्यांनी डागले.
९९ टक्के लोकांकडे काळा पैसा नाही तरीही त्यांना आर्थिक आणीबाणीचा सामना करावा लागत आहे. ५० कुटुंबीयांकडे लाखो आणि करोडो रुपये आहेत. तोच काळा पैसा आहे, याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले.