मोदींची ही नोटबंदी म्हणजे गोरगरिबांविरोधातील युद्ध असून त्यांचे उद्दिष्ट वारंवार बदलत असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील दादरी येथे एका सभेत बोलत होते.
दादरी- देशात ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी लागू झाल्यापासून गरिब, कष्टकरी वर्ग ख-या अर्थाने कॅशलेस झाला असून सारे काही उद्योगपतींच्या आणि त्यांना कर्जे देणा-या बँकांच्या फायद्यासाठी चालले असल्याची सणसणीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील दादरी येथे एका सभेत बोलताना केली. मोदींची ही नोटबंदी म्हणजे गोरगरिबांविरोधातील युद्ध असून त्यांचे उद्दिष्ट वारंवार बदलत असल्याचेही ते म्हणाले.
नोटबंदी लागू झाल्यानंतर सर्वसामान्य कष्टकरी वर्गाने त्यांचे पैसे बँकेत भरले आहेत. हे पैसे पुढील ६ महिने बँकेतच राहावेत, आणि त्यातून उद्योगपतींची सुमारे ८ लाख कोटी रुपयांची कर्जे परत करता यावीत, हा यामागील छुपा उद्देश असून यामुळे देश घायाळ झाला असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी आधी काळय़ा पैशाविरोधात नोटबंदीचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते, नंतर बनावट नोटांविरोधात लढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते सांगत आहेत. १०० रुपयांपैकी अवघे २ पैसे इतक्या प्रमाणात बनावट चलन असून मोदींच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या दोनच दिवसांत एका दहशतवाद्याकडे खोटी नवी नोट सापडली होती.
आता ते कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत, त्यांची या निर्णयामागील उद्दिष्टे वारंवार बदलत असली, तरी त्यांनी या निर्णयाने आधीच सर्वाना कॅशलेस केले असल्याचीही उपरोधिक टीका राहुल यांनी यावेळी केली.