राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुपोषणग्रस्त भागाच्या दौ-यावर असताना आणखी आदिवासी बालकाचा मृत्यू होतो.
मुंबई- राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुपोषणग्रस्त भागाच्या दौ-यावर असताना आणखी आदिवासी बालकाचा मृत्यू होतो. पालकमंत्र्यांना लोकांनी मतदारसंघात येण्यास बंदी घातल्यानेने सरकारचे अपयश उघड झाले आहे, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कुपोषणासंदर्भात दिलेल्या नोटीशीमधून हे अपशय उघड झाले आहे.
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषण पाहणीचा दौरा करत असताना राहुल वाडकर या कुपोषित आदिवासी बालकाचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे. मुंडे यांचा हा दौरा पालघरचे पालकमंत्री व आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या विधानसभा मतदारसंघात असताना सावरा या दौ-यातून गायब होते.
जनतेच्या असंतोषाला घाबरून एखाद्या मंत्र्याने स्वत:च्या मतदारसंघात न जाण्याचा हा पहिला प्रकार असेल. मुंडे यांच्या दौ-याच्या दुस-याच दिवशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्यातील वाढत्या कुपोषणाची गंभीर दखल घेऊन नोटीस दिली. एका पाठोपाठ घडलेल्या या घटनांनी राज्यातील वाढत्या कुपोषणाबाबत सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना अद्याप मुख्यमंत्र्यांनी यावर साधे भाष्यही केलेले नाही. विदेशातून परतल्यावर तरी मुख्यमंत्री या प्रकाराची गंभीर दखल घेऊन राज्यातील आदिवासी भागांचा दौरा करतील का, अशीही विचारणा विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
विखे-पाटील यांची आमिर खानबरोबर चर्चा पालघर व एकंदरीतच राज्यातील आदिवासी भागातील वाढत्या कुपोषणाबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अभिनेता अमीर खानसोबत चर्चा केली. आमीरला कुपोषण जनजागृतीसाठी युनिसेफने नेमलेला सदिच्छा दूत असल्याने विखे-पाटील यांनी त्याला कुपोषणाच्या वाढत्या प्रमाणाबाबत माहिती दिली.