बांबरवाडीच्या प्राथमिक मराठी शाळेला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला आणि संपूर्ण गावाला आनंद झाला. एरव्ही बांबरवाडीच्या तऱ्हेवाईक लोकांमुळे हा गाव आणि गावातील लोकं अख्ख्या जिल्हयात बदनाम झाली होती.
बांबरवाडीच्या प्राथमिक मराठी शाळेला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला आणि संपूर्ण गावाला आनंद झाला. एरव्ही बांबरवाडीच्या तऱ्हेवाईक लोकांमुळे हा गाव आणि गावातील लोकं अख्ख्या जिल्हयात बदनाम झाली होती. त्यामुळे लोकांच्या वागण्यामुळे बदनाम झालेला गाव किमान शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार मिळाल्याने तरी जिल्हयात नावारूपास आल्यामुळे गावातल्या मान्यवर लोकांना बरं वाटलं. अर्थात या शाळेचे मुख्याध्यापक दयाराम कान्हेरे यांचे या पुरस्कारात मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत आणि गावाच्या वतीने करण्यात आले.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते कार्यक्रमावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे गावचे उपसरपंच अण्णा किर्लोसकर रिप्लेसमेंट प्रमुख पाहुणे बनले. शाळेच्या व्हरांडयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयत्या वेळी गटशिक्षणाधिका-यांचे येणे रद्द झाल्यामुळे त्यांच्या जागी प्रमुख पाहुणे झालेल्या अण्णांना भयंकर आनंद झाला. मुख्य म्हणजे प्रमुख पाहुणे असल्यामुळे आपल्याला खूप काही बोलता येईल हा, आनंद त्यांना अधिक होता.
कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला सहशिक्षिका श्रीमती दांडेकर मॅडम यांनी सभेचे प्रास्ताविक केले. त्यानंतर शाळेचे दुसरे शिक्षक बांदिवडेकर व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुकाराम नागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शेवटी प्रमुख पाहुणे म्हणून बोलायला उपसरपंच अण्णा किर्लोस्कर उभे राहिले. नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी सुरुवातीला घसा खाकरून साफ केला. तांब्यातील तळाला लागेल एवढं पाणी पेल्यात ओतून साफ झालेला घसा थोडासा ओला केला आणि भाषणाला सुरुवात केली.
‘मंडळी, आपल्या शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार मिळाला ही बातमी कळल्यावर खरंच खूप बरं वाटलं. पण खरं सांगू, कार्यक्रमाला येण्यापूर्वी आदर्श या शब्दाचा मी भयंकर धसका घेतला होता. कारण काही दिवसांपूर्वी आदर्श सोसायटीचा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजत होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आसनही डळमळीत झाले होते. काय मास्तर?’ मुख्याध्यापक कान्हेरे गुरुजींकडे पाहून अण्णांनी हा प्रश्न केल्यावर कान्हेरे गुरुजी कावरे-बावरे झाले.
अण्णांना नक्की काय म्हणायचंय तेच त्यांच्या लक्षात येत नव्हतं. त्यानंतरही तोच धागा पकडून भाषण करायला मिळालेली संधी वाया न घालवता आदर्श शाळेचा विषय बाजूला ठेवून अण्णांनी आदर्श सोसायटीवरच बोलणं जास्त पसंत केलं. आदर्श सोसायटीच्या घोटाळयाबद्दल अण्णा इकडे भरभरून बोलत असताना तिकडे कान्हेरे गुरुजींना दरदरून घाम फुटत चालला होता. शेवटी शेवटी अण्णांना अनावश्यक ठिकाणी टाळया मिळत चालल्याने त्यांनी नाईलाजाने आपले भाषण आवरतं घेतलं आणि कार्यक्रम संपविण्यात आला.
त्यानंतर चहापाणी झालं. पण अण्णांच्या भाषणाचा नेमका हेतू शेवटपर्यंत न कळल्याने कान्हेरे गुरुजींचे कशातच लक्ष लागत नव्हते. शेवटी ‘खाई त्याला खवखवे’ या उक्तीप्रमाणे कान्हेरे गुरुजींनी अण्णांना एका कोप-यात घेतलं आणि त्यांना विचारलं,
‘अण्णा, तुम्हाला नेमकं भाषणातून काय सांगायचं होतं?’ यावर अण्णा मिश्कीलपणे हसले आणि म्हणाले, ‘मास्तरांनू, माका काय म्हणाचा हा ता तुमकाव चांगला म्हायती आसा.
खरा सांगाचा तर ता सगळा जगजाहीरच आसा.’ अण्णांच्या या कोडयातील बोलण्याने मास्तर अधिकच धास्तावले. शेवटी मनाचा हिय्या करून ते सावधपणे म्हणाले,
‘अण्णा, खरं सांगायचं तर मी सर्व शिक्षा अभियानातून कंपाऊंड वॉलसाठी मिळालेल्या पन्नास हजारांतील फक्त आठ हजार रुपयेच खाल्ले. पण हे अजिबात जगजाहीर नाही.’
‘मास्तर, अवो काय सांगतास काय तुमी? हय़ां माका म्हायती नव्हता.’
‘म्हणजे? हे तुम्हाला खरंच माहीत नव्हतं?’
‘आता तुमच्याकडसून हय़ां माका कळला.’
‘अहो, मग तुम्ही हे सगळं जगजाहीर आहे ते कशाबद्दल बोललात?’
‘आदर्श सोसायटीबद्दल!’ अण्णा म्हणाले आणि मास्तरांचा चेहरा साफ उतरला. पण अण्णा मास्तरांना म्हणाले,
‘मास्तरांनू, तुमच्या आदर्श शाळेतलो आदर्श घोटाळो तुमीच माका सोताच्या तोंडान आता सांगितलास. पन हय़ां सगळा जगजाहीर होव नये हेच्यासाठी माजो काय वाटो?’
‘संध्याकाळी दोन हजार रुपये तुमच्या घरपोच करतो.’
‘दोन हजारांत काय भागतला? यव्हार फिप्टी-फिप्टी होव्क व्हयो. बरोबर चार हजार घरपोच करा. आनी याक काम करा, आता माज्याकडे बोललास ता दुस-या कोनाकडे बोलू नका. शाळेक आदर्श शाळेचो पुरस्कार मिळालो हा. थंयसर आदर्श सोसायटीचे वरचे मजले गेले.
हयसर वरचा-बिरचा काय चलाचा नाय. सरळ मुळाकच घाव घालाचो लागतलो.’ अण्णांनी मास्तरांना मोलाचा सल्ला दिला आणि आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची पणाला लागली असली तरी अनेक दिवस बायको मागे लागल्याने आपल्या घरी प्लास्टिकच्या चार खुर्च्या घरी येणार म्हणून ते भयंकर खूश झाले.