गैरव्यवहारांचे आरोप झाल्यावर लालकृष्ण अडवाणी, बंगारु लक्ष्मण, नितीन गडकरी या नेत्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
मुंबई- गैरव्यवहारांचे आरोप झाल्यावर लालकृष्ण अडवाणी, बंगारु लक्ष्मण, नितीन गडकरी या नेत्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मुलाच्या कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमी अमित शहा यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन व्यवहारांची चौकशी करणा-या सरकारने अमित शहा यांच्या पुत्राचीही चौकशी करावी, अशी मागणी केली.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या कंपनीच्या उलाढालीत वर्षभरात १६ हजार पटींनी वाढ झाल्याचे प्रकरण उघड होताच काँग्रेसने शहा यांना लक्ष्य केले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या सा-या व्यवहारांची चौकशीची मागणी केली. तसेच शहा यांच्या पुत्राच्या कंपनीस १० कोटींचे कर्ज ऊर्जा खात्याशी संबंधित एका कंपनीने दिले होते. ऊर्जा खाते भूषविलेल्या पीयूष गोयल यांनीच शहा यांच्या समर्थनार्थ पुढे येणे हे अयोग्य होते, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
शहा यांच्या पुत्रावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्याकरिता पीयूष गोयल या केंद्रीय मंत्र्याने समर्थन करणे कितपत योग्य आहे, असा सवालही चव्हाण यांनी केला. एका खासगी व्यक्तीचे केंद्रीय मंत्री समर्थन कसे करू शकतो, अशी शंकाही चव्हाण यांनी व्यक्त केली. शहा यांच्या पुत्राने गेल्या ऑक्टोबर अखेरीस कंपनीचा गाशा गुंडाळला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. हा योगायोग की अन्य काही, असा सवालही चव्हाण यांनी केला. संशयास्पद व्यवहार असलेल्या सुमारे दोन लाख कंपन्या समोर आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. संशयास्पद व्यवहार असलेल्या कंपन्यांचा शोध घेणे आणि शहा यांच्या पुत्राने कंपनी बंद करणे याचा काही संबंध आहे का, हेसुद्धा स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
[EPSB]
[/EPSB]