‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत संपूर्ण राज्यात, तसेच मुंबईत मोठय़ा प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे.
मुंबई- ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत संपूर्ण राज्यात, तसेच मुंबईत मोठय़ा प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये तसेच स्थनिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून केंद्र शासनाने शहरांना क्रमांक देण्यास सुरुवात केली. यात मुंबईला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकांना स्वच्छतेसाठी दिवसातील दहा ते पंधरा मिनिटे द्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजिलेल्या ‘स्वच्छता हीच सेवा- पंधरावडा’ राबविण्यात येत आहेत. त्याचा प्रारंभ महापालिकेच्या महात्मा ज्योतीबा फुले मंडईत करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षात स्वच्छ भारताचा संदेश दिला आणि सर्व देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. स्वच्छतेसाठी शौचालयाची संख्या वाढवून एक प्रकारचे मोठे अभियान सुरू झाले. यातून घनकचरा व्यवस्थापनाची सुरूवात झाली.
नगर विकास विभागाने घनकच-याचे व्यवस्थापन उत्तम केले, असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेसाठी पंधरवडा जाहीर केला, त्याचा आजपासून औपचारिक प्रारंभ झाला आहे. ही मोहीम २ ऑक्टोबर पयर्ंत म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत चालणार आहे. या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रत्येकाने कचरा न करायचा असे ठरवू आणि आपले शहर स्वच्छ करूया, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्वच्छतेच्या बाबतीत देशात आपले मुंबई शहर क्रमांक एकचे व्हावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, आमदार राज पुरोहित, स्थानिक नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, मार्केटचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
[EPSB]
[/EPSB]