उद्योगांना ठरावीक काळासाठी ठरावीक दराने वीज पुरवण्याचे आदेश सर्व राज्यांना केंद्र सरकारने दिले आहेत.
नवी दिल्ली- उद्योगांना ठरावीक काळासाठी ठरावीक दराने वीज पुरवण्याचे आदेश सर्व राज्यांना केंद्र सरकारने दिले आहेत. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय उर्जामंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
देश आता पुरेशी वीजनिर्मिती करत असून त्यामुळे राज्यांनी विनाव्यत्यय वीजपुरवठा करून उद्योगांना आकर्षित केले पाहिजे, असे ते म्हणाले.
उद्योगांना विनाव्यत्यय वीजपुरवठा हवा आहे. जर आम्ही विजेची हमी देऊ शकलो तर उद्योगांमध्ये गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी उद्योगांना ठरावीक दराने दहा ते पंधरा वर्षासाठी वीज पुरवावी, अशी मी विनंती केली आहे.
केंद्रीय वीज प्राधिकरणाकडे राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ऊर्जा तुटवडयाचे प्रमाण २.१टक्के इतके कमी झाले आहे. दोन दशकातील हे सर्वात नीचांकी प्रमाण आहे. २०१६-१७ चालू आर्थिक वर्षात तर वीजतुटवडयाचे प्रमाण आणखी कमी होऊन फक्त ०.९ टक्क्यावर आले आहे, असे गोयल यांनी सांगितले.
येत्या तीन वर्षात प्रत्येक घरात वीज मिळेल, या दृष्टीने केंद्राने अनेक पावले उचलली असल्याचा दावा त्यांनी केला. देशात पुरेशी वीज उपलब्ध असतानाही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत विजेची मागणी व पुरवठा यात तफावत असल्याचे त्यांनी मान्य केले.
विजेचे पारेषण व वितरणावरील मर्यादा, तांत्रिक व व्यावसायिक नुकसानीचे उच्च सरासरी प्रमाण आणि राज्यांच्या वितरण संस्थांची खराब आर्थिक अवस्था ही कारणे यामागे असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.