पाच राज्यांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात आहेत. सहा राज्यांच्या निवडणुका होऊन गेल्या, त्या सहा राज्यांमध्ये फक्त एक आसाम राज्याची सत्ता भाजपाच्या हातात आली आणि तीही काँग्रेस नेतृत्वाच्या मूर्खपणामुळे आली. आसामचे त्यावेळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री तरुण गोगाई हे म्हातारे झाल्यामुळे त्यांना बदलले असते तर आसाममध्येही भाजपाला झोपवता आले असते.
एक अपवादात्मक राज्य भाजपाला त्या सहा निवडणुकांत मिळाले. बाकी दिल्ली, बिहार, बंगाल, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये भाजपा साफ झाला आहे. मोदींचा अश्वमेध उधळला होता. त्याचा लगाम दिल्लीने पहिला खेचला आणि पाठोपाठ बिहार, बंगाल, तामिळनाडू आणि केरळने या घोडय़ाला जागेवरच उभा करून ठेवला. २०१४ च्या निवडणुकीत उधळलेला मोदींचा घोडा या पाच राज्यांच्या निवडणुकीत जमिनीवर आणण्याचे काम मतदारांनी केले आणि आता पुढच्या महिन्यातील पाच निवडणुकांमध्ये या देशात नवा अवतार झालेल्या हुकूमशहाच्या राजकीय अस्ताची सुरुवात या पाच राज्यांची निवडणूक करणार आहे. त्यानंतर गुजरातची निवडणूक आहे.
गुजरातच्या घरच्या मैदानावरही मोदींचे टाके ढिले झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण नरेंद्र दामोदरदास मोदी ही व्यक्ती लोकशाहीवादी व्यक्ती नाही. त्या व्यक्तिमत्त्वात एक मुजोर हुकूमशहा ठसाठस भरलेला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांची देहबोली, त्यांची भाषा आणि त्यांचे एकूण वर्तन हे संपूर्ण देशाने निषेध करावा असेच होते. त्यावेळचे भाजपाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही मोदींच्या मस्तवाल वागण्याचा संताप आलेला होता आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ‘राजधर्माचे पालन करावे’ अशा संयमित शब्दांत अटलबिहारी वाजपेयी यांनी आपली भावना मनोमन स्पष्ट केलेली होती.
गुजरातमधील कांडे हे मोदींसाठी, भाजपासाठी आणि या देशासाठी लांच्छनास्पद होते. पण तरीही या देशातील मतदारांना एक अशी भुरळ पडली की, त्यामुळे या देशाने नको त्या माणसाच्या हातात सत्ता दिलेली आहे. भाजपामधील तद्दन जुने-जाणते मोदींच्या नावाने बोटे मोडीत आहेत. वाजपेयी यांची प्रकृतीच ढासळल्यामुळे आणि विस्मरण झाल्यामुळे आज ते बोलू शकत नाहीत. पण लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्याला आता काही मिळवायचे नाही. ज्या त्वेषाने आणीबाणीच्या विरोधात ही मंडळी रस्त्यावर आली होती त्याच त्वेषाने त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांविरुद्ध आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.
आज कुणालाही ही अतिशयोक्ती वाटेल पण काही दिवस थांबा आणि पाहा.. मोदींविरोधात भाजपामध्ये अतिशय प्रखरपणे आवाज उठल्याशिवाय राहणार नाही. कारण पंतप्रधानपद आणि पक्षाचे अध्यक्षपद या दोन्हींवर कब्जा करून मोदींनी एका पक्षीय हुकूमशहाने, पक्षीय हुकूमशहाप्रमाणेच वागत आहेत. खासगीमध्ये अडवाणी जेव्हा बोलताता तेव्हा मोदींच्या विरोधात बोलतात. ‘पार्टी का पुरा सत्यानाश हो गया’ अशी भावना व्यक्त केली जात आहे. ती दबक्या आवाजात आहे. परंतु पक्षांतर्गतही मोदी आणि त्यांच्या भोवतीचे ठरावीक चमचे सोडले तर भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते आता मोदींच्याविरुद्ध संघटित होण्याची वेळ फार दूर नाही. कारण मोदींनी गेल्या अडीच वर्षात देशाच्या मूलभूत सिद्धांतालाच आव्हान द्यायला सुरुवात केली आणि तो सिद्धांत आहे.. या देशाचे लोकशाही राज्य, हे कल्याणकारी राज्य आहे. त्या कल्याणकारी राज्यात सगळ्यात मोठे अकल्याण या देशातील सामान्य माणसाचा विडा देऊन मोदींनी उचलला.
देश अशा कडेलोटात येऊन पोहोचला आहे की, सरकार नावाची वस्तू अस्तित्वात नाही. एक हुकूमशहा आपल्या तालावर देशाला नाचवत आहे. महाराष्ट्रातील सरकारचे भागीदार असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी बोलताना मोदींना हुकूमशहा म्हटले. अरे जर मोदी हुकूमशहा आहेत तर या सरकारचे कंबरडे मोडून रस्त्यावर या ना.. का त्या सरकारला जीवदान देता? रंगशारदामध्ये एक बोलायचे आणि बीकेसीच्या मैदानावर मोदीस्तुती करायची हा दुटप्पीपणा बंद करा. जर मोदी हुकूमशहा आहेत – आणि त्यांची पावले तशीच पडत आहेत तर शिवसेनेने हे सरकार पाडले पाहिजे. या मुख्यमंत्र्यांनाही एकप्रकारची मस्ती आहे.
ज्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोदी बोलतात आणि भ्रष्टाचार को नही बक्क्षा जायेगा अशी टाळय़ा खाणारी वाक्ये फेकतात तेव्हा मोदींकडे आरोपाचे एक बोट आहे. आणि त्या ४२ कोटी रुपये खाल्ल्याच्या आरोपाचा मोदींनी इन्कार केलेला नाही. २०१४ च्या निवडणुकीत देशातील महत्त्वाचे पाच उद्योगपती मोदींच्या मागे आहेत आणि आजही आहेत. त्यांच्या थैल्यांवरच २०१४ ची निवडणूक लढली गेली. तो भ्रम पैदा होण्याकरिता काँग्रेस राजवटीतील भ्रष्टाचाराची काही प्रकरणे सोशल मीडियाने अशी जोरात रंगवली की, अण्णा हजारे यांना हाताशी धरून भाजपाने देशभर वातावरण तयार केले. त्या वातावरणाचा फायदा घेऊन लोकांमध्ये भ्रम पैदा झाला.
वास्तविक भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणात त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारने कठोर कारवाई केली आहे. स्पेक्ट्रम घोटाळा प्रमोद महाजन यांनी सुरू केला. ए. राजा आणि कळमोळी हे मंत्री दोषी असे दिसताच त्यांना तुरुंगात घातले. क्रीडा संकुल घोटाळय़ातील कलमाडींना तुरुंगात घातले. तिकीट नाकारले. पवन बन्सल यांना तिकीट नाकारले, मंत्रीपदावरून हाकलले, त्यापूर्वी गेल्या ३०-३५ वर्षात केवळ न्यायालयाने ठपका ठेवला म्हणून बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव निलंगेकर, अशोक चव्हाण, वीरभद्रसिंग अशा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात ऐ-यागै-यांनी नव्हे, तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ४२ कोटी रुपये मोदींना उद्योगसमूहांनी दिल्याचा थेट आरोप केला आहे. त्याचा इन्कार मोदींनी केलेला नाही. ही ४२ कोटी रक्कम तर मोदींसाठी पॉकेटमनी असेल. लाखो रुपयांचा कोट घालणारा माणूस, त्यांच्या तोंडातील फकीर असल्याची भाषा हे ढोंग आहे. व्यापम घोटाळय़ातील ५० जणांचे बळी गेल्यावरही मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री मिजाशीत कारभार करतो आहे. काँग्रेसच्या राजवटीत एका मुख्यमंत्र्यांच्या काळात असे काही घडले असते तर ती उमा भारती मुंडन करायला निघाली असती. तिकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांनी धोलपूर राजवाडय़ाचे पंचतारांकित हॉटेल केले आणि तिथे ललित मोदींना घुसवले हा सगळा भ्रष्टाचार नाही, असे भाजपाला वाटते, मोदींना वाटते.
महाराष्ट्राच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तर एक नव्हे तर दहा चोर बसलेले आहेत आणि त्यांना हे मुख्यमंत्री स्वच्छतेच्या चरित्र्याची सर्टिफिकेट वाटत आहेत. इतके भ्रष्ट मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीही नव्हते. या सर्व भ्रष्टाचारांविरुद्ध आणि मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध दुर्दैवाने कोणी बोलत नाही. राहुल गांधी यांनी थेट आरोप केला. त्याचा इन्कार झाला नाही. जर मोदी प्रामाणिक असते तर त्यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याकरिता राहुल गांधी यांना कोर्टात खेचले असते. पण ती हिंमत होत नाही. कारण ४२ कोटी रुपयांची नोंद अनेक ठिकाणी झालेली आहे. त्याचे पुरावेही काही जणांच्या हातात आहेत. पण ४२ कोटी रुपये ही रक्कम अत्यंत छोटी रक्कम आहे. मोदींचा सगळा प्रचाराचा व्यवहार अब्जावधी रुपयांत झालेला आहे. आणि भ्रष्टाचारमुक्त भारत हेच त्यांचे सर्वात मोठे ढोंग आहे. नोटाबंदी हेही सर्वात मोठे ढोंग आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी तर देश निकालात काढला. शेतकरी निकालात निघाला.
पुढची तीन वर्षे शेतकरी आता उठत नाही. पण मोदी आणि भाजपाला शेतक-यांचे काही पडले नाही. त्यांना जपायचे आहे फक्त कापर्ोेरेट सेक्टरला. उच्च मध्यमवर्गीयाला आणि शहरातील व्यावसायिकांना. स्मार्ट सिटी योजना त्यातूनच आली. शहरातील मतदारांवर सगळी शक्ती केंद्रित करावी, असे भाजपाच्या कोअर कमिटीत यापूर्वीच ठरलेले आहे. त्यात संघवाल्यांची डोकी चालतात. भावनात्मक विषय कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. सामान्य लोक भावनेला हात घातल्यावर हळवे होतात. पण अडीच वर्षातील मोदींची ही सगळी लबाडी आता देशाला आणि जगाला कळली. नोटाबंदी हा भाजपाचा खेळ भाजपासाठीच होता.
आठ दिवस आगोदर ज्यांना कळवायचे त्यांना कळवून झाले आणि त्याच्या बदल्यातल्या सगळय़ा व्यवस्था झाल्यानंतर निर्णय झाला. हा जो कोणी ऊर्जित पटेल शोधून काढला गेला, हे पटेल महाशय रिलायन्समध्ये होते. त्या रिलायन्समधून मोदींनी त्यांना उचलून आणले आणि रिझव्र्ह बँकेला बटीक करून टाकले. आजपर्यंतच्या सगळय़ा परंपरा मोडीत काढून, थेट हस्तक्षेप करून संरक्षण दलाचा प्रमुखही गुजरातचाच करून टाकला. या सर्वाचा स्फोट आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही. सागराला एका बाजूने हटवले तरी दुस-या बाजूने तो उफाळून येतो आणि भूकंपाचे लिंपण करता येत नाही. मोदींनी देश अशा कडेलोटाच्या टोकावर आणून ठेवलेला आहे.
२०१४च्या निवडणुकीत खोटी आश्वासने देणारा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून आता मोदींची इतिहासात नोंद झाली आणि पंतप्रधान झाल्यानंतर महागाईच्या आगीत देशाला होरपळून काढणारा एक हुकूमशहा म्हणून त्यांची ओळख होणार आहे. अडीच वर्षात सामान्य माणसाला दिलासा मिळेल, असे कोणतेही निर्णय मोदींनी किंवा महाराष्ट्र शासनाने घेतलेले नाहीत. हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य तर स्त्रियांवरील बलात्कार आणि अत्याचारात क्रमांक एकवर आहे. याची फडणवीस सरकारला लाज-शरम काहीही वाटत नाही. असे हे भाजपाचे राज्य आता दुस-यांदा मोठय़ा पराभवास सामोरे जायला निवडणुकीच्या रूपाने पुढे आलेले आहे.
देशभरात अशी हवा करण्यात आली होते की, सर्व काही मोदी आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेमधील सगळय़ा संकल्पना मोदींनी मोडून टाकलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्या त्या राज्यातील स्थानिक भाजपा नेतृत्वाला कवडीची किंमत राहिलेली नाही. निवडणुकीची आखणी मोदी करणार, राज्यातील प्रचारसभांना मोदी येणार, त्यामुळे एका खांबावर एक पक्ष ज्या दिवशी उभा राहतो तो खांब ज्या दिवशी कोलमडेल त्या दिवशी सगळा पक्ष कोलमडून पडेल.
जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाची फटफजिती होईल. गोवा, मणिपूर, उत्तराखंड ही तर छोटी राज्ये आहेत. त्यापैकी मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे राज्य आहे. पंजाबमध्ये अकाली दलाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशात सपाचे राज्य आहे. एक गोवा विधानसभा सोडली तर निवडणुका जाहीर झालेल्या पाच राज्यांत भाजपाचे एकहाती राज्य कुठेही नाही आणि होणा-या निवडणुकांमध्ये पंजाबमधील सहयोगी पक्ष म्हणून भाजपा जिथे सत्तेत सहभागी आहे, त्या पंजाबमध्येही भाजपाचे राज्य निकालात निघणार आहे. या देशातील सर्व राजकीय पक्षांनी आपले जे काही मतभेद असतील ते सगळे मतभेद गुंडाळून घेऊन एकच निर्णय केला पाहिजे की, जिथे जिथे भाजपाचे राज्य आहे ते ते राज्य पहिल्याप्रथम मोडीत काढले पाहिजे आणि भाजपा हा पक्ष आणि त्याचे आता असलेले मोदी हे राष्ट्राचे मुख्य शत्रू आहेत, असे समजून भाजपाला या देशातून हद्दपार केले पाहिजे. वरून दिसायला सभ्य दिसणारी ही वस्तू आतून खूप ढोंगी आहे.
एकवेळ भ्रष्टाचारी माणूस एक टक्का परवडेल. पण ढोंगी माणूस परवडणार नाही. यांची भाषणे, त्यांचे ढोंगी रूप, भ्रष्टाचारावरील त्यांचा राग हे सगळे ढोंग आहे. नोटाबंदी हाच मोठा भ्रष्टाचार आहे. पी. चिदंबरम यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीतून नोटाबंदीतील भ्रष्टाचार अतिशय स्पष्टपणे आजपर्यंत उघड केलेला आहे. देशातील कुणीही नोटाबंदीचे समर्थन केलेले नाही. सामान्य माणसांनी तर नाहीच नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नोटाबंदीचे समर्थन केले आणि ते मोदींच्या जवळ जाऊ इच्छितात, त्यामागचे राजकारण वेगळे आहे. लालूप्रसाद त्यांना डोईजड होत आहेत. त्यांना वेगळे करून पूर्वीच्या बिहार सरकारात नितीशकुमार यांना जसे भाजपाचे समर्थन होते तीच खेळी बिहारमध्ये पुन्हा खेळली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा नितीशकुमार यांनी दिलेला पाठिंबा हा राजकीय हिशेब करून दिलेला पाठिंबा आहे.
नोटाबंदीतून सामान्य माणसांचा छळ मोदींनी केला आणि ३७४ जणांचे बळी घेतले. हे महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विधानसभेत विरोधी पक्षाच्या बाकावर होते तेव्हा असे तावातावाने विधानसभेत सांगायचे की, शेतक-यांनी केलेल्या आत्महत्या हा मुख्यमंत्र्यांनी केलेला खून आहे. ३०२ कलमाखाली काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, असे देवेंद्र फडणवीस बोलले होते. ते मुख्यमंत्री झाल्यावरही आत्महत्या सुरूच आहेत. आता फडणवीस यांच्यावर कोणत्या कलमाखाली खटला भरायचा? मोदींच्या नोटाबंदीनंतर ३७४ जणांचा मृत्यू झाला. आता जर कोणी असे म्हटले की, मोदींच्या निर्णयामुळे झालेले हे खून आहेत आणि ३०२च्या कलमाखाली पंतप्रधानांवर खटला भरा तर फडणवीसांना चालेल काय? सत्ता नसताना वाह्यात बोलणारी ही मंडळी आहेत आणि सत्ता मिळाल्यानंतर ढोंगाचा बुरखा पांघरून भ्रष्ट मंत्र्यांना क्लीनचिट देत हे मुख्यमंत्री निघालेले आहेत.