ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
‘पंतप्रधान मोदींचा हा निर्णय क्रांतिकारी आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. मोदींनी टाकलेल्या या पावलामुळे काळा पैसा बाहेर पडेल, देशाची प्रगती होईल,’ असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
यापूर्वी आम्ही देशहितासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घाला, अशी मागणी केली होती, असे अण्णांनी नमूद केले. या निर्णयामुळे बनावट नोटा, काळा पैसा बाहेर पडेल. अतिरेकी काळा पैसा आपल्याविरोधात वापरत होते, असे अण्णा म्हणाले.
‘काळा पैसा परत पांढरा करू नये. यासाठी आमची दुसरी मागणी मान्य करावी. सर्व राजकीय पक्षांच्या देणगीचे ऑडिट करावे. राजकीय पक्ष २० हजारांच्या आतील देणग्यांचा हिशेब देत नाहीत. देणग्यांचे २० हजाराचे टप्पे करून, बोगस नावे देऊन काळा पैसा पांढरा करतात. निवडणूक आयोगाने देणग्यांचे स्पेशल ऑडिट करावे,’ अशी मागणी अण्णांनी केली आहे.
दरम्यान, दोन हजार रुपयांच्या नोटांत गडबड होण्याची शक्यता आहे. तो व्यावहार गरीब करत नाहीत. त्यात पुन्हा काळा पैसा तयार होईल, याबाबत पुनर्विचाराची गरज आहे, असेही अण्णा म्हणाले. दोन हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक व्यवहार रोख करावेत. त्यावरील व्यवहार चेकने करावेत. त्यामुळे काळ्या पैशाला ब्रेक लागेल, असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला.