पक्षांनी बहुतेक जागांवरील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यातील अनेकांनी उमेदवारी अर्ज भरण्याचीही प्रकिया सुरू झाली आहे.
मुंबई- अरे या..या..स्वागत आहे तुमचे..अरे यांच्या चहा-नाष्टाचे बघा. अरे तो फोटोवाल्याला बोलवा.. तो प्रिंटिंग प्रेसवाला अजून कसा आला नाही? अरे याला बोलव, रात्रीच्या जेवणाची काय सोय केली आहे? कदाचित ही वाक्ये ऐकून तुम्हाला एखाद्या लग्नघरातच आलो की काय असे भासेल; परंतु ही सर्व लगबग सुरू आहे; ती मुंबईतील राजकीय पक्ष कार्यालयांत.
पक्षांनी बहुतेक जागांवरील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यातील अनेकांनी उमेदवारी अर्ज भरण्याचीही प्रकिया सुरू झाली आहे. त्याच बरोबर आपल्या प्रभागावर लक्ष केंद्रित करत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केला आहे. अन्य वेळेस याच उमेदवार तथा राजकीय नेत्यांच्या कार्यालयात जाण्यास टाळाटाळ करणारे कार्यकर्ते आता मात्र स्वत:हूनच कार्यालयात गर्दी करू लागले आहेत.
दादा-भाऊ-आप्पा असे म्हणत उमेदवारांशी जवळीक साधत त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त कसा आर्थिक फायदा घेता येईल? याचे गणित मांडत तासन्तास कार्यालयात घुटमळत आहेत. त्यामुळे ही ओसाड कार्यालये आता कार्यकर्त्यांंच्या उपस्थितीने गजबजू लागली आहेत. कोणी म्हणत आहे भाऊ माझ्याकडे शंभर मते आहेत. तर कोणी दादा माझ्याही मागे गाव आहे, अशा फुशारक्या मारत उमेदवाराच्या नजरेत आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
याच प्रमाणे कार्यालयातील फोनही आता अधिक प्रमाणात खणखणू लागले आहेत. निवडणूक सव्र्हे करणारे, मतदारांपर्यंत जाहीरनाम्यातून पोहोचवणारे, स्ट्रिकर्स छापणारे यांनीही उमेदवारांचे कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यापेक्षा आपले काम कसे उत्तम आहे? हे दाखवून देत या व्यवसायिकांतही भलतीच चढाओढ सुरू झालेली दिसत आहे.
निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर उमदेवारांचा प्रचार-प्रसार करण्यास आचारसंहिता बजावली आहे. तरीसुद्धा हौशेगौशे आपल्या नेता तथा उमेदवाराला खूश करण्यासाठी ‘एकच वादा आमचा दादा’ अशी जाहिरातबाजी करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या इराद्याने उतरलेले उमेदवार या घडीला कोणाचीच नाराजी ओढवून घेण्यास धजावत नाहीत. उलट मतदारराजाची तसेच आपल्यासाठी काम करणा-या कार्यकर्त्यांची मनधरणी करताना दिसत आहेत.
शक्य तेवढय़ा त्यांच्या इच्छा-आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. ताई-माई-आक्का करत महिलांनाही मानसन्मान देऊन त्यांची खुशहाली विचारत आहेत. तर काही उमेदवार याही पुढे जाऊन तिला भावनाप्रदान करून तुझ्या या भावालाच मतदान कर, कायम मी तुझ्या पाठिशी उभा राहीन, अशी ग्वाहीही देत आहेत.