जिल्ह्यात पाण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिका-यांच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला; मात्र या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले असून, शेतक-यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
धुळे- जिल्ह्यात पाण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिका-यांच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला; मात्र या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले असून, शेतक-यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलिसांच्या लाठीमारात काही महिला आंदोलक जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्याची स्थिती अजूनही भीषण आहे. अनेक गावांना अद्याप पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, या मागणीसाठी धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी सकाळापासून शेतक-यांचे आंदोलन सुरू होते. दहा गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे कार्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांनी शेतक-यांच्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले.
त्यांनतर शेतक-यांचा पारा चढला आणि घोषणाबाजीस सुरुवात केली. संतापलेल्या शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
इमारतीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे आंदोलक शेतक-यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गेल्या महिन्यात प्रशासनाकडून पाण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अजूनही पाणी उपलब्ध न झाल्याने शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला होता. पोलिसांनी या वेळी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.