पोलीस हवालदारांच्या मुलांसाठी वरळीत नव्याने नूतनीकृत बालवाडी सुरू करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी या बालवाडीचे उद्घाटन केले.
मुंबई- पोलीस हवालदारांच्या मुलांसाठी वरळीत नव्याने नूतनीकृत बालवाडी सुरू करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी या बालवाडीचे उद्घाटन केले. व्होल्ट्स लिमिटेड या टाटा समूहाच्या कंपनीतर्फे औद्योगिक कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकीतून (सीएसआर) हे नूतनीकरण करण्यात आले आहे.
आपले पालक कर्तव्य बजावत असताना, स्वच्छ, सुरक्षित आणि आनंदी वातावरण असलेल्या या बालेवाडय़ांमध्ये मुलांना शिकता येईल तसेच आपला वैयक्तिक विकासही करता येईल. व्होल्ट्सने याशिवाय शहरातील आणखी ७ पोलीस बालवाडय़ांचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पोलीस दलातील वरिष्ठ पदाधिकारी तसेच व्होल्ट्सचे अधिकारी आणि व्यवस्थापक मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांना दरदिवशी असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो.
अत्यंत खडतर आणि तणावाच्या या कामात आमच्या सैन्याला कायम प्रोत्साहनाची गरज असते. शहरातील पोलीस वसाहतीतील बालवाडय़ांचे नूतनीकरण करण्यासाठी व्होल्ट्सने पुढाकार घेतला, हे पाहून बरे वाटले. आता कर्तव्य बजावणा-या पुरुष आणि महिला पोलिसांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होणार आहे. नूतनीकरणाच्या या कामाला व्होल्ट्सच्या व्यवस्थापनाने पाठिंबा दिला, त्याबद्दलही त्यांनी आभार मानले.
व्होल्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोहरी म्हणाले की, एखाद्या सुसंस्कृत समाजाचा भक्कम पाया हा कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा असतो.
मुंबई पोलीस ही देशातील सर्वोत्तम सुरक्षा यंत्रणा असल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. आपल्या रक्षणासाठी ते दिवस-रात्र काम करत असतात. त्यामुळेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करण्याचे ठरवले. म्हणूनच ज्या ठिकाणी मुंबई पोलिसांची मुले शिकतात आणि आपली प्रगती करतात, अशा मुंबईतील सर्व बालवाडय़ांचे नूतनीकरण आम्ही करण्याचे ठरवले.