झाकीर नाईक यांच्या भाषणावर व ‘पीस टीव्ही’वर बंदी घातली जात असेल, तर हिंदू समाजाच्या भावना भडकवणा-यांवर आणि ‘सूदर्शन टीव्ही’वरही बंदी का नको, असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
पुणे- झाकीर नाईक यांच्या भाषणावर व ‘पीस टीव्ही’वर बंदी घातली जात असेल, तर हिंदू समाजाच्या भावना भडकवणा-यांवर आणि ‘सूदर्शन टीव्ही’वरही बंदी का नको, असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. झाकीर नाईकची भाषणे भडकावू आहेत, असे सरकारचे म्हणणे असेल, तर मग दोन वर्षे सरकार झोपले होते का? असा टोलाही त्यांनी लगावला.
‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चे झाकीर नाईक काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात साडपले आहेत. प्रत्येक मुस्लिमाने दहशतवादी बनावे, हे त्यांचे विधान, बांगलादेशसह अनेक भागांतील त्यांचा वाढत प्रभाव या पार्श्वभूमीवर झाकीर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
त्यांच्याबाबत बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, झाकीर नाईक यांना मी भेटलो आहे. ते इस्लाममधील योग्य विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. त्यांनी शांतीचा संदेश दिला आहे. तरीदेखील सरकारला झाकीर नाईक यांच्याबाबत आपत्ती आहे. त्यांचे भाषण भडकावू आहे, असे सरकारचे म्हणणे असेल, तर मग दोन वर्षे सरकार झोपले होते का? तेव्हाच सरकारला हे का कळले नाही? त्यांची भाषणे यूटय़ूबवर आणि पीस टीव्हीवर सुरू होती.
झाकीर नाईक मुस्लिमांना भडकवत असल्याच्या कारणावरून त्यांच्या भाषणावर सरकारने बंदी घातली आहे. ते मुस्लिमांना भडकवतात, असे सरकारला वाटत असेल, तर मग हिंदूंना भडकवणारेदेखील अनेक जण आहेत. त्यांच्यावरदेखील सरकारने कारवाई करावी. मोदी असीमानंद, आसाराम बापूंना भेटतात. त्यांच्या पाया पडतात. त्याचे काय? असा टोलाही त्यांनी लगावला.
काश्मीरमधील स्थिती भीषण आहे. तरीदेखील मोदी सरकार याबाबत गंभीर नाही. मोदी अजूनही परदेशातच फिरत आहेत. ते लहानातील लहान बाबसुद्धा ट्विटरवर टाकत असतात. काश्मीरमध्ये शंभर लोकांचा मृत्यू झाला. त्याबाबत मोदी का बोलत नाहीत. तरीदेखील त्यांनी आपला आफ्रिकेचा दौरा सुरूच ठेवला आणि टान्झानियात ढोल वाजवत बसले. ते स्वत:चाच ढोल वाजवण्यात मग्न असतात.
हे सरकार काश्मीरमध्ये होणा-या हिंसाचाराच्या घटनेबाबत संवेदनशील नाही. तेथील लोकांच्या भावना त्यांना समाजत नाहीत. गृहमंत्रीदेखील याबाबत ट्विटरच्या माध्यमातून तेथील जनतेला शांतीचा संदेश देतात. पण तेथील इंटरनेट बंद असल्याने त्यांच्या भावना तेथील लोकांपर्यंत कशा पोहोचणार? असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.
येणा-या निवडणुकीत शरद पवार यांनी सर्व पक्षांना एकत्र आणावे!
येणा-या पालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व सेक्युलर पक्षांनी एकत्र येऊन एकजुटीने लढायला हवे, यासाठी शरद पवार यांनी चर्चा घडवून आणावी. त्यांची पडद्यामागून चर्चा सुरूच आहे; पण ती आता त्यांनी उघड उघड करावी.