शेतकरी युद्धात जिंकला मात्र तहात हरला, मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना गंडवले’, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
मुंबई- ‘शेतकरी युद्धात जिंकला मात्र तहात हरला, मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना गंडवले’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शनिवारी पहाटे संप मागे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले, यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली.
शरद पवार म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी शेतक-यांना गंडवले. कर्जमाफी फक्त अल्पभूधारक शेतक-यांचीच का? महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. शेतमाल खरेदी करताना हमीभाव न देणा-यांवर फौजदारी करण्याचा सरकार कायदा करते. पण अशा वेळी सरकारने शेतमालाची स्वतः खरेदी करून शेतक-यांना दिलासा द्यायचा असतो.’
‘शेतकरी संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात आहे, असा आरोप करणे हे पोरकटपणाचे लक्षण आहे,’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवला.
‘अल्पकर्जधारक शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देऊन राज्य सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याला भुलून संपात फूट पडू देऊ नका,’ असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. ‘शेतक-यांना संपवण्याची या सरकारची भूमिका आहे. पण शेतकरी बांधवांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे,’ असेही ते म्हणाले.
‘शेतक-यांनी संपावर जाण्याचे हत्यार उपसणे ही देशाच्या इतिहासातील अभुतपूर्व पण सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची घटना आहे. राज्यातील शेतक-यांना संपवण्याचे धोरण सध्याच्या राज्य सरकारचे असल्याने शेतकरी संपावर गेला आहे,’ असेही ते म्हणाले.
‘स्वामिनाथन समिती मीच नेमली होती, त्यांच्या काही शिफारसी आम्ही स्वीकारल्या. पण आजच्या सत्ताधा-यांनी २०१४ च्या निवडणुकीत स्वामिनाथन लागू करू असे आश्वासन दिले होते. आता त्यांची जबाबदारी आहे. निवडणूकीपूर्वी भाजपाने शेतक-यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. पण निवडणुकींनंतर शेतक-यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या,’ असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेतक-यांनी ऐतिहासिक संप पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपकरी शेतक-यांचे प्रतिनिधी यांच्यात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे चार तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेदरम्यान शेतक-यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असून हा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शनिवारी पहाटे चार वाजता शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली. मात्र शेतकरी अद्यापही संपावर ठाम आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या ऐतिहासिक संपात फूट पाडण्याचा सरकारचा डाव आहे की काय, अशी चर्चा सुरू आहे.