मुंबईतील एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा झालेला मृत्यू हे सरकारच्या अनास्था व बेपर्वाईने घडवलेले हत्याकांड असून त्याबद्दल दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुंबई- मुंबईतील एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा झालेला मृत्यू हे सरकारच्या अनास्था व बेपर्वाईने घडवलेले हत्याकांड असून त्याबद्दल दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी केली आहे. घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याबरोबरच मुंबईकरांना बुलेट ट्रेन पेक्षा सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे, त्यामुळे बुलेट ट्रेन साठी जे ५ हजार कोटी रु. राज्य शासन खर्च करणार आहे, ते तातडीने मुंबईच्या रेल्वेच्या सुधारणेसाठी वर्ग करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत व चौकशी समितीची घोषणा करून राज्य सरकारनं आपली जबाबदारी झटकू नये, असा इशाराही श्री. मुंडे यांनी राज्य सरकारला दिला. मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वेपुलावरील चेंगराचेंगरीत २२ जण मृत्युमुखी पडल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याबद्दल मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले. मुंडे यावेळी म्हणाले की, मुंबईतील दादर, ठाणे, बोरिवली, अंधेरी, घाटकोपरसारख्या अनेक छोटय़ा-मोठय़ा स्थानकांवरील रेल्वेपूल व फलाट हे मृत्यूचे सापळे बनले आहेत. मुंबई रेल्वेचा प्रवास हा जगातला सर्वात असुरक्षित प्रवास बनला आहे.
एलफिन्स्टनचे नाव बदलून प्रभादेवी करण्यापलीकडे गेल्या तीन वर्षात रेल्वेची परिस्थिती सुधारण्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. मुंबईवर सातत्याने अन्याय करणा-या मोदी सरकारने मुंबईसह देशातल्या लाखो रेल्वेप्रवाशांचा जीव धोक्यात ठेवून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट घातला. मोदी सरकारचा प्राधान्यक्रम कसा चुकीचा आहे हे या दुर्घटनेने दाखवून दिले आहे, परंतु त्यासाठी २२ निरपराध प्रवाशांना जीव गमवावा लागला, हे दुदैर्वी असल्याची खंतही मुंडे यांनी व्यक्त केली.
[EPSB]
[/EPSB]