नागपुरात संघाचा दसरा मेळावा होतो, मुंबईत उद्धव ठाकरेंचा मेळावा होता, पण इथं गोरगरिबांचा मेळावा होत असताना पंकजा मुंडेंलाच का बंदी असते?, माझं काय चुकलं?, असा थेट सवाल महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी विचारला.
बीड- नागपुरात संघाचा दसरा मेळावा होतो, मुंबईत उद्धव ठाकरेंचा मेळावा होता, पण इथं गोरगरिबांचा मेळावा होत असताना पंकजा मुंडेंलाच का बंदी असते?, माझं काय चुकलं?, असा थेट सवाल महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी विचारला. आम्हाला आता सावरगावात भगवानबाबा दिसताहेत असे सांगत नवा भगवानगड स्थापनेचे संकेतही त्यांनी दस-याच्या मुहूर्तावर दिले.
भगवानगडावर राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना विरोधामुळे याही वर्षी पंकजा मुंडे विरुद्ध भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा वाद चांगला गाजला. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे अखेर भगवानबाबाच्या जन्मभूमीत सावरगावात पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा साजरा केला. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी अलोट गर्दी केली होती.
भाषणाच्या सुरुवातील पंकजा मुंडे यांनी चक्रव्युहामध्ये अडकलेल्या अर्जुनाचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, ‘मी स्वत:ला प्रश्न विचारतेय की माझं काय चुकलं?, हा दसरा मेळावा कुणासाठी आहे?, मी राज्यभरात अनेक देवस्थानांच्या कार्यक्रमाला जाते, शिवनेरीला शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जाते, पण मला कुठेच बंदी नसते. फक्त भगवानगडावर मला बंदी असते.
मला कोणताही वाद नको होता, माझ्या कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता म्हणून भगवानबाबांच्या जन्मभूमीत मेळावा घेतला. महाराष्ट्रातील सर्व लोकांना विनंती करते, तुमचे पाण्यात ठेवलेले देव काढा, पंकजा मुंडे कुणाच्या घरात डाका टाकायला जात नाही. पंकजा मुंडे स्वत:च्या नावासाठी काम करत नाही. पंकजा मुंडे जनतेसाठी काम करते’, असेही पंकजांनी ठणकावून सांगितले.
भगवानगडावर महंत नामदेवशास्त्रींची मागील वर्षी डिसेंबरमध्ये भेट घेतली होती तेव्हा ते गादीवर बसले होते. त्यांच्या पाया पडून त्यांचा निरोप घेतला होता. त्यावेळी ‘त्यांनी काळजी घ्या’ असा सल्ला दिला होता. पण आज मला भगवानगडावर येऊ दिले नाही. त्याचे उत्तर मला मिळाले. कर्मभूमीने नाकारले तरी भगवानबाबांच्या जन्मभूमीने आम्हाला बोलावले. भगवानगडावर दर्शन झाले नाही पण जन्मभूमीत आम्हाला भगवानबाबा आता आम्हाला सावरगावात दिसताहेत. या मेळाव्यातून आम्ही सावरगावात आता भगवानबाबा दिसताय हा निर्णय आम्ही जनमानसातून घेतला. अशी जनता कुणासोबत आहे हे एकदा पाहून घ्या. पंकजा मुंडेच जनतेसोबत आहे. ज्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा व्यक्ती जर भेटला तर मी त्याचा हात धरून पुढे करेल आणि मी मागे होईल, अशी भावनिक सादही पंकजा मुंडे यांनी घातली.
[EPSB]
[/EPSB]