शहरात कुठेही पाणी तुंबणार नाही, या पालिकेच्या दाव्याला हिंदमाता परिसर दरवेळी पुरून उरतो. ब्रिटानिका पाणी उपसा केंद्र उभारल्यावरही हिंदमाता परिसरातील पाणी भरण्याची समस्या सुटलेली नाही.
मुंबई- शहरात कुठेही पाणी तुंबणार नाही, या पालिकेच्या दाव्याला हिंदमाता परिसर दरवेळी पुरून उरतो. ब्रिटानिका पाणी उपसा केंद्र उभारल्यावरही हिंदमाता परिसरातील पाणी भरण्याची समस्या सुटलेली नाही. २९ ऑगस्टच्या मुसळधार पावसात हिंदमातावरून पालिकेला पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आल्याने आता पालिका या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नव्याने विचार करत आहे. यासाठी पालिकेत संबंधित विभाग अधिका-यांची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे.
शहरात पाऊस पडला आणि हिंदमाता परिसरात पाणी साठले नाही, असे सहसा होत नाही. २९ ऑगस्ट रोजी दुपारी पडलेल्या मुसळधार पावसानंतर मध्यरात्रीपयर्ंत हिंदमाता परिसरातील पाणी ओसरले नव्हते. हिंदमाताच्या या परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत डॉकयार्डजवळ ब्रिटानिका पाणी उपसा केंद्र उभारण्याचा सल्ला देण्यात आला होता.
गेल्यावर्षी हे केंद्र कार्यरत झाले. मात्र हे केंद्र उभारल्यावरही हिंदमाताकडील पाणी जलदगतीने ओसरत नसल्याचे दिसून आले. हिंदमाता हा उपनगरे व दक्षिण मुंबई यांना जोडणारा महत्त्वाचा परिसर आहे. या भागामध्ये पाणी तुंबून रस्ते वाहतूक तसेच पश्चिम व मध्य रेल्वेची सेवाही कोलमडत असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे हिंदमाताच्या या पूर्वापार व गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेत मंगळवारी विशेष बैठक बोलावली आहे.
अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे होत असलेल्या या बैठकीला पर्जन्य जलवाहिन्या विभाग, भुयारी जलवाहिन्या बांधकाम विभाग, देखभाल विभाग तसेच संबंधित वॉर्डचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
[EPSB]
पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे या पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात डेंग्यूने तिघांचे बळी घेतले आहेत.
[/EPSB]