अशा सहज सुचलेल्या काव्यपंक्तींमधून पाली गावाचे वर्णन कवीने केले आहे. निसर्गाचे वरदान लाभलेलं गुहागर व चिपळूण तालुक्याच्या हद्दीजवळील हिरव्यागार डोंगररांगा, कसदार डोंगर उताराची जमीन, बारमाही संथ वाहणारी नदी आणि जागृत असे पालेश्वर दैवत अशी पार्श्वभूमी लाभलेले निसर्गसुंदर गाव म्हणजेच पाली होय. या गावाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गावात ग्रामस्थांची एकजूट आणि त्या एकीतून राजकारणविरहित विधायक कार्य मोठया प्रमाणात होत असते.
डोंगर-द-यांनी वेढिले, वृक्षलतांनी व्यापिले
सुंदर हे पाली ग्राम, मज हेची मुक्तीधाम ॥ धृ॥
गावातून नदी वाहते, खळखळ गीत गाते
नदीजवळ वसले सांब.. ॥ १॥
माझ्या गावचे दैवत, आहे महान जागृत
घेईन सदा त्याचे नाम.. ॥ २॥
घर माझे नदीकाठी, बागमळा आणि शेती फुलती
गाळीन येथेच मी घाम..॥ ३॥
देवा येथे तुझ्या पायी, अशा पवित्र या ठायी
मज मिळू दे विराम, मज हेची मुक्तीधाम
अशा सहज सुचलेल्या काव्यपंक्तींमधून पाली गावाचे वर्णन कवीने केले आहे. निसर्गाचे वरदान लाभलेलं गुहागर व चिपळूण तालुक्याच्या हद्दीजवळील हिरव्यागार डोंगररांगा, कसदार डोंगर उताराची जमीन, बारमाही संथ वाहणारी नदी आणि जागृत असे पालेश्वर दैवत अशी पार्श्वभूमी लाभलेले निसर्गसुंदर गाव म्हणजेच पाली होय. या गावाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गावात ग्रामस्थांची एकजूट आणि त्या एकीतून राजकारणविरहित विधायक कार्य मोठया प्रमाणात होत असते.
डोंगरद-यांमुळे गावात जांभा दगडाची मोठी वाहतूक केली जाते. या जांभ्या दगडाची बांधबंदिस्ती करून वाडवडिलांनी शेतीसाठी डोंगरउताराची धूप थांबवून जागा शेतीयोग्य तयार केली. नदीपर्यंत डोंगरच असल्यामुळे वरकस जमीन जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे पाणथळ भातशेतीची जमीन कमी प्रमाणात आहे. बारमाही वाहणा-या लहान नदीमुळे गावात बागायती शेती मोठया प्रमाणावर आहे. या भागात सर्व प्रकारची नैसर्गिक, वनौषधी तसेच फळझाडे मोठया प्रमाणावर आहेत.
यामध्ये आंबा, फणस, काजू, खर, आईन, किंजळ, हरडा, बेहडा, रातांबा अशा प्रकारची मोठी झाडे तर करवंद, कन्हेरी, तोरणे या फळांची झुडपे आहेत. गावात रोजगार हमी योजनेतील आंबा, काजू कलमे व सागवान या झाडांची सुद्धा लागवड मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. नदीकिनारी नारळी-पोफळींच्या बागा आहेत. पाली गावातील शेवग्याच्या शेंगा विशेष चवदार आहेत. त्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी आहे.
गावामध्ये हिंदू, बौद्ध, लोहार, तेली, मराठा, कुणबी इत्यादी धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. गावातील सर्व जाती-धर्माचे लोक अनेक वर्षे गावात गुण्यागोविंदाने राहतात. गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महाशिवरात्र, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती आदी सर्व धर्माचे सण मोठया उत्साहाने साजरे करतात. तसेच पूर्ण गाव तंटामुक्त झाला आहे. गावात एकूण ८ वाडया आहेत. यामध्ये बौद्धवाडी, नलावडेवाडी, देणवाडी, मधलीवाडी, पेजलेवाडी, धनावडेवाडी, शिर्केवाडी, पाटीलवाडी यांचा समावेश होतो.
गावाच्या विकासासाठी गावात निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायतीची स्थापना १९७४ मध्ये करण्यात आली. परंतु आतापर्यंत ग्रामपंचायतीसाठी कधीच निवडणूक झाली नाही. गावाच्या विकासासाठी आजपर्यंत ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्यात येत आहे. यामध्ये ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे.
ग्रामस्थांच्या एकीमुळेच गाव विकासाच्या वाटेवर आहे. गावच्या विकासासाठी आतापर्यंत आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच कार्याचा वसा घेत विद्यमान सरपंच अनिता नलावडे, उपसरपंच सखाराम पेजले व अन्य सदस्य तोच आदर्श घेत गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या कार्यात सामाजिक कार्यकर्ते अनिल नलावडे यांचादेखील सिंहाचा वाटा आहे, असे गावकरी सांगतात.
गावामध्ये शिक्षणाच्या सोयीसाठी एकूण ३ प्राथमिक शाळा आहेत. तीनही शाळांना जि.प.चा आदर्श पुरस्कार मिळाला आहे. जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा पाली क्र. १चे मुख्याध्यापक संजय जंगम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी कटिबद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी शिक्षक ऋतुजा सोहनी, राजू अहिरे, नीळकंठ पांचाळ विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेला डिजिटल क्लासरूम व प्रोजेक्टर देण्यात आला आहे. याद्वारे प्रभावी अध्यापन केले जाते. जि.प. शाळा पाटीलवाडी क्र. २मधील शिक्षक राजेंद्र बारे, संतोष कोलते हेही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटत आहेत. तसेच जि.प. आदर्श प्राथमिक शाळा देणवाडी गुहागरच्या शैक्षणिक वाटचालीत आदर्शवत आहे. शिक्षक अविनाश वैद्य, मारुती फटकरे यांच्या माध्यमातून शिक्षणासोबत शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. येथील धरण प्रतिकृती पाहण्यासाठी जिल्ह्यातील शाळांचे विद्यार्थी याठिकाणी येत असतात. ग्रामस्थ व शिक्षकांच्या पुढाकाराने येथील शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे.
पाली गावचे मुख्य दैवत म्हणजे पालेश्वर हे नदीकिनारी वसलेले स्वयंभू देवस्थान आहे. पालेश्वर मंदिराच्या बाजूला साळूबाई व काळीश्री देवी या ग्रामदेवतांचे मंदिर आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी पालेश्वरास अभिषेक करण्यासाठी गावातील तसेच परिसरातील भाविक येतात. गावात महाशिवरात्रीचा उत्सव मोठया उत्साहाने साजरा होतो. यावेळी तीन दिवस भजन, कीर्तन, जागर होऊन उत्सव साजरा केला जातो. ग्रामदेवतेच्या मंदिरात नवरात्रोत्सव, देवदीपावलीला देवीचा जागरण गोंधळ घातला जातो. शिमगोत्सव देखील या ठिकाणी मोठया उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये स्थानिक ग्रामस्थ व शहरातील चाकरमनी मोठया उत्साहाने सहभागी होतात.
होळीच्या सणाला पालखी सहाणेवर आणली जाते. त्यानंतर ही पालखी घरोघरी भक्तांच्या भेटीकरिता फिरते. गुढीपाडव्याच्या दिवशी पालखी मंदिरात नेली जाते व शिमगोत्सवाची सांगता होते. गावात पाटीलवाडी येथे मारुती मंदिर, पेजलेवाडी येथे राधाकृष्ण मंदिर तर देणवाडी येथे वाघजाई मंदिर आहे. याठिकाणीदेखील विविध कार्यक्रम पार पडतात. बौद्धवाडीमध्ये बौद्धजन सहकारी संघ पालीच्या वतीने बुद्ध जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिन तसेच अन्य महापुरुषांची जयंती साजरी होते.
गावात बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती व बागायती हा आहे. तसेच दुग्ध व्यवसायातही येथील शेतक-यांनी प्रगती केली आहे. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजतागायत गावामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध होत आहे. गावचे पोलीस पाटील अनिल नलावडे व तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीधर नलावडे यांनी शांतता व सलोखा टिकवून गावाला तंटामुक्त पुरस्कार प्राप्त करून दिला आहे. एकूणच ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे पाली हे गाव विकसनशील होत आहे.