एसटी महामंडळाकडे प्रवाशांनी पाठ दाखवण्यास सुरुवात केली असून गेल्या पाच वर्षात तब्बल १७ कोटी ६१ लाख प्रवासी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई- एसटी महामंडळाकडे प्रवाशांनी पाठ दाखवण्यास सुरुवात केली असून गेल्या पाच वर्षात तब्बल १७ कोटी ६१ लाख प्रवासी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाकडूनच प्रवासी संख्येची आकडेवारी सादर करण्यात आली असून त्यामध्येच ही बाब उघड झाली. एकीकडे प्रवासी संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे एसटीची आर्थिक परिस्थितीही ढेपाळली असून संचित तोटा १,८०० कोटी रुपयांवरून २,१०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात एसटीला मोठय़ा प्रमाणात आर्थिक चणचण भासू शकते.
एसटी महामंडळाकडे सध्याच्या घडीला १८ हजार ६०० बस असून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी येत्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणात वातानुकूलित बस टप्प्याटप्प्यात दाखल होतील. तर सर्व सोयीसुविधांनीयुक्त बस तळ व बस स्थानकांचा विकासही केला जाणार आहे. यामुळे प्रवासी आकर्षित होतील आणि आर्थिक परिस्थितीही सुधारेल, अशी आशा एसटी महामंडळाला आहे. परंतु सध्याच्या घडीला एसटीकडे प्रवाशांनी पाठच दाखवण्यास सुरुवात केली आहे. २००९-१० सालापासून ते २०१२-१३ पर्यंत एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होत होती. वाढत जाणा-या प्रवासी संख्येमुळे एसटीला कोणतीही चिंता नव्हती. २००९-१० साली २३८ कोटी ५८ लाखांपयर्ंत असणारी प्रवासी संख्या २०१२-१३ साली थेट २६१ कोटी ३७ लाखांपयर्ंत पोहोचली.
मात्र २०१२-१३ सालानंतर प्रवासी संख्येचा आलेख उतरत गेला. २६१ कोटी ३७ लाख प्रवासी संख्येवरून २०१६-१७ सालापर्यंत प्रवासी संख्या थेट २४३ कोटी ७६ लाखांपर्यंत पोहोचली. हे पाहता गेल्या पाच वर्षात तब्बल १७ कोटी ६१ लाख प्रवासी कमी झाले. यासंदर्भात एसटीतील सूत्रांनी सांगितले की, साधारण जून २०१६ पासून राज्यातील एसटीच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणा-या समांतर फे-या या काही प्रमाणात बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यात होणारी अवैधरीत्या प्रवासी वाहतूक यामुळे एसटीचे प्रवासी कमी होण्यामागील कारण असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी कमी होतानाच एसटीची आर्थिक परिस्थितीही ढेपाळत आहे. २०१५-१६ मध्ये १,८०० कोटी रुपयांचा असणारा संचित तोटा २०१६-१७ मध्ये २,१०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
डिझेल दरवाढ, कर्मचा-यांचा पगार यामुळे आर्थिक बोजा जास्त पडत असल्याची माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. जर सातवा वेतन आयोग लागू झाल्यास हा बोजा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याच्या घडीला एसटीचे ८ हजार कोटी रुपयांचे बजेट असून त्यात ५ हजार ३०० कोटी रुपये तर कर्मचा-यांच्या वेतनावरच खर्च होतात. सातवा वेतन आयोग लागू केल्यास १२ हजार कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडू शकतो, असे सांगण्यात आले. यासंदर्भात रणजितसिंह देओल यांना विचारले असता, तुम्ही जनसंपर्क अधिका-यांकडे बोला असे सांगून बोलणे टाळले.
[EPSB]
[/EPSB]