जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने सलग दुस-या दिवशी पाकिस्तानचा हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.
जम्मू- जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने सलग दुस-या दिवशी पाकिस्तानचा हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. रामपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणा-या सहा दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले असून यामध्ये हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार भट्ट ऊर्फ अबू झरारचाही समावेश आहे. सबजार हा बुरहान वानीचा साथीदार होता. आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता असून सध्या लष्कराकडून या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवरील तणाव प्रचंड वाढला आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सज्ज असलेल्या भारतीय लष्कराने पाक दहशतवाद्यांना चांगलाच दणका दिला आहे.
शुक्रवारी उरी येथे भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) हल्ल्याचा कट उधळून लावला होता. यावेळी भारतीय सैन्याने बॅटच्या दोन सैन्यांना ठार मारले होते.
भारतीय लष्कराला नियंत्रण रेषेवर काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गोळीबार केला. घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर गोळीबार केला. या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले, अशी माहिती मिळाली आहे.