मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांत एकही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतलेल्या अकरावीच्या विशेष फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश शनिवारी पूर्ण झाले.
मुंबई- मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांत एकही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतलेल्या अकरावीच्या विशेष फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश शनिवारी पूर्ण झाले.
या फेरीसाठी ज्या ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नव्याने नोंदणी केली होती त्यापैकी ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित झालेल्यांपैकी ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. उर्वरित १५ हजार ३२३ विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतले नाहीत. यामुळे प्रवेश नाकारणा-या विद्यार्थ्यांनी गैरमार्गाने ऑफलाईन प्रवेश घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांत गुणवत्ता यादीत पहिल्या ते तिस-या पसंतीक्रमात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले होते. त्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची आहे. दुस-या व तिस-या व उर्वरित पसंतीक्रमाप्रमाणे प्रवेश निश्चित झालेल्या असंख्य विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेतले नाहीत.
हेच विद्यार्थी आपल्याला प्रवेश पुन्हा मिळाले नसल्याचा दावा करत प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करण्याची मागणी करून गोंधळ घालण्याची शक्यता आहे. विविध महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना फूस लावली जातेय का, याची माहितीही शिक्षण उपसंचालक कार्यालय घेत आहेत.
ऑफलाईन प्रवेशाविरोधात कडक कारवाई
शिक्षण विभागाने १६ तारखेपासून ठेवलेल्या दुस-या विशेष प्रवेश फेरीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूनही प्रवेश घेतला नाही. अशा विद्यार्थ्यांची सविस्तर यादी तयार केली जाणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेश घेऊन जाणीवपूर्वक ऑनलाईनचे प्रवेश घेण्यास टाळाटाळ केली अशा विद्यार्थ्यांची माहितीही घेतली जाणार आहे.
एकही विद्यार्थी ऑफलाईनमधून गैरप्रकाराने प्रवेश घेतल्याचे आढळल्यास संबंधित महाविद्यालयांविरोधातही कडक कारवाई केली जाणार आहे. जे विद्यार्थी यात दिसून येतील त्यांना पुढे बारावीच्या परीक्षेला मुकावे लागेल, असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.