सर्वसामान्य ग्राहकांना रडवणा-या कांद्याने आता चक्क आता शेतक-यांना रडवण्यास सुरुवात केली आहे.
श्रीगोंदा- सर्वसामान्य ग्राहकांना रडवणा-या कांद्याने आता चक्क आता शेतक-यांना रडवण्यास सुरुवात केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी कमी झाल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून पिकाला हमी भाव देण्याची मागणी जोर धरत आहे.
डिसेंबर २०१५ अखेपर्यंत देशांतर्गत तसेच आंतराष्ट्रीय बाजारातून कांद्याची मोठया प्रमाणात मागणी वाढल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते.
सोलापूर, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर आदी बाजारपेठांत गेल्या वर्षी डिंसेबर महिन्यात शेतक-यांना चांगला बाजार भाव मिळाला. आशिया खंडातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा सुमारे ७ ते ८ हजार प्रतिक्विंटल दराने विकला गेला होता.
कांद्याचे भाव देशभरात कडाडल्यानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. निर्यात बंदीनंतर दोन दिवसांतच कांद्याच्या भावात घसरण झाली; ती अद्याप सावरलेली नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.
बाजारात कांद्याची आवक मोठया प्रमाणात वाढली असतानाच; देशांतर्गत बाजारातून मागणी कमी झाल्याने भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून प्रत्येक पिकाला हमीभाव देण्याची मागणी जोर धरत आहे.