गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करताना पृथ्वीच्या आकारात झालेला अणू केंद्रकापेक्षा हजार पटींनी लहान बदल टिपण्याची किमया जगभरातील अनेक शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच साकारू शकली.
पुणे- गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करताना पृथ्वीच्या आकारात झालेला अणू केंद्रकापेक्षा हजार पटींनी लहान बदल टिपण्याची किमया जगभरातील अनेक शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच साकारू शकली. या शोधामध्ये गुरुत्वीय लहरी पकडणा-यां अमेरिकेच्या लायगो वेधशाळांचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या विेषणाच्या तंत्राचेही आहे.
नोबेल पारितोषिक जर तिघांपेक्षा अधिकजणांना दिले गेले असते, तर कदाचित आज त्यात भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश असता, असे मत ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ प्रा. संजीव धुरंधर यांनी व्यक्त केले. प्रा. धुरंधर यांनी मोजक्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत १९८०च्या दशकात भारतात गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाचा पाया रचला. ‘लायगो’सारख्या अतिशय संवेदनशील यंत्रणेमधून गुरुत्वीय लहर गेली, तरी तिचे अस्तित्व सिद्ध करणे म्हणजे वाळवंटातून सुई शोधण्यासारखे कठीण काम होते.
मात्र, धुरंधर यांच्या गटाने भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकीच्या माध्यमातून लायगोकडून येणा-यां माहितीतून गुरुत्वीय लहर शोधण्याचे आणि त्याद्वारे तिच्या उगमाचा अंदाज बांधणारे मॉडेल बनवले. भारतीय शास्त्रज्ञांच्या या कामामुळेच गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व जगाला समजू शकले.
यंदाच्या भौतिकशास्त्रातील नोबेलविषयी प्रा. धुरंधर म्हणाले, ‘तिघा अमेरिकी शास्त्रज्ञांनी या विषयाचा पाया रचला आणि गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. नोबेलसाठी त्यांची झालेली निवड अतिशय योग्य आहे. मात्र, आजचे विज्ञान हे मेगा प्रोजेक्टचे आहे. जिथे जगभरातील अनेक देशांचे शास्त्रज्ञ एकत्र येऊन संशोधन करतात. नवीन शोध लागताना अशा सर्वाचे योगदान तितकेच महत्त्वाचे असते.
[EPSB]
सर्व स्थानके फेरीवालेमुक्त करा
[/EPSB]