व्हर्जिनिया येथे भारतीय वंशाचे नागरिक आणि गुंतवणूकदार यांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राईकमुळे जगात भारताचा दबदबा वाढल्याचा संदेश देत भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.
वॉशिंग्टन- अमेरिका दौ-याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्जिनिया येथे भारतीय वंशाच्या नागरिकांची भेट घेवून त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे जगात भारताचा दबदबा वाढला असल्याचे सांगितले. या दरम्यान त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. तसेच आपल्या संबोधनात त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि चीनला इशाराही दिला.
‘दहशतवादाला प्रत्युत्तर देताना जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले, त्यावेळी जगाला आमची ताकद काय आहे याचा अंदाज आला. आमच्या सर्जिकल स्ट्राईकवर कोणत्याही देशाने शंका उपस्थित केली नाही,’ हे या सर्जिकल स्ट्राईकचे यश आहे. अर्थात ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असा चिमटा मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता काढला. याद्वारे मोदींनी भारतावर छुपे युद्ध लादणा-या पाकिस्तान आणि चीनला एक प्रकारे गर्भित इशाराच दिला.
दहशतवादाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही ज्यावेळी जगाला दहशतवाद समजवायचो तेव्हा तो कोणाला समजत नव्हता. आज दहशतवादाने स्वतःच जगाला याबाबत समजावले आहे, त्यामुळे आता संपूर्ण जगाला दहशतवाद समजला आहे’.
रात्री २ वाजताही ट्विट केल्यानंतर स्वराज भारतीयांना मदत करतात
यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मोदींनी विशेष कौतूक केले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर स्वराज यांनी करून दाखवला. रात्री २ वाजताही ट्विट केल्यानंतर स्वराज भारतीयांना मदत करतात. भारतीय परराष्ट्रीय खाते हे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांपर्यंतही पोहोचले आहे. तीन वर्षात परदेशांत अडकलेल्या ८० हजार भारतीयांची स्वराज यांनी सुटका केल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारतीय तरुणी उझमा अहमद हिला पाक नागरिकाने बंदुकीचा धाक दाखवून पाकिस्तानमध्ये पळवून नेले होते. या तरुणीला भारतीय उच्चायुक्तालयाने परत भारतात आणले, याचे सर्व श्रेय सुषमा स्वराज यांना जात असल्याचेही पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले.
त्याआधी मोदींनी येथे जगभरातल्या २१ दिग्गज कंपन्यांच्या सीईओंची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहनही यावेळी मोदी यांनी येथे सीईओंना केले. पुढील महिन्यात भारतात जीएसटी लागू होत असून, त्यामुळे आर्थिक परिवर्तन घडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.