देशाचा विकासदर वाढत असताना दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. राजकारण बाजूला ठेवून बेरोजगारी का वाढते? याचा विचार करायला हवा.
मुंबई- देशाचा विकासदर वाढत असताना दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. राजकारण बाजूला ठेवून बेरोजगारी का वाढते? याचा विचार करायला हवा.
आपल्या देशाचा तरुणही जागतिक स्पर्धेत टिकून राहील यासाठी तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन व्यावसायभिमुख अभ्यासक्रम सरकारने आणण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले. केवळ शिव वडापाव केंद्र सुरू करून चालणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.
राज्यातील वाढत्या बेरोजगारीसंदर्भात विरोधी पक्षातर्फे नियम-२९३अन्वये विधानसभेत प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावरील चर्चेत आमदार नितेश राणे म्हणाले की, मोदी सरकारकडून कौशल्य विकास आणि डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा डांगोरा पिटला जातो.
पण आपले आयटीमधील कोर्स पाहिले तर जागतिक स्पर्धेत आपला तरुण टिकेल का? असा प्रश्न पडतो. याबाबत गंभीरपणे विचार करायला हवा. कोकणातील प्रकल्पांबाबत या सरकारची कोणतीही ठोस भूमिका नाही, याकडेही त्यांनी रोजगाराच्या दृष्टीने लक्ष वेधले.