कोपर्डीतील घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने दिरंगाई केली. त्यामुळेच राज्यात अंत्यत तणावपूर्ण वातावरण तयार झाले.
मुंबई- कोपर्डीतील घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने दिरंगाई केली. त्यामुळेच राज्यात अंत्यत तणावपूर्ण वातावरण तयार झाले. राज्यातील जनतेच्या अपेक्षा या सरकारकडून पूर्ण होत नसल्यानेच मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल सभागृहात निवेदन केल्यानंतरही लोक शांत होत नाहीत.
त्यामुळे राज्यातील जनतेचा तुमच्यावर विश्वासच उरलेला नाही, जनतेत विश्वासार्हता राहिली नसल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी स्थगन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सरकारवर तोफ डागली.
सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपवर ज्या प्रकारे संदेश फिरत आहेत ते वाचल्यानंतर हा ज्वालामुखी कधीही फुटेल, अशी शंका निर्माण झाली आहे. राज्यातील तरुण, संस्था रस्त्यावर उतरून ज्या भावना व्यक्त करत आहेत, त्या समजून घेण्याची गरज असल्याचेही नितेश राणे यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
राज्यातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी सदस्यांनी सरकारवर जनतेचा विश्वास असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असता नितेश यांनी त्यांचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री निवडून येतात त्या नागपूर जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत बलात्काराच्या ८० केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे राज्य कुठल्या पद्धतीने सुरक्षित वाटते, नागपूरमध्ये साखळी चोरांच्या भीतीने महिला मंगळसूत्र घालण्यास घाबरत आहेत.
मे महिन्यापर्यंत १२५६ चोरीच्या विविध घटना घडल्या आहेत. त्यापैकी केवळ २८ टक्के चोरांचा तपास झाला आहे. हीच का तुमची विश्वासार्हता? त्याही पुढे जाऊन केंद्रीयमंत्री व ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या मेहुण्याच्या घरी घरफोडी झाल्याचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे या सरकारवर जनतेने विश्वास तरी कसा ठेवायचा, असा सवालही नितेश यांनी उपस्थित केला.
कोपर्डीतील घटनेचा मी निषेध करतो. आज महाराष्ट्रात जे काही वातावरण आहे, मुख्यमंत्र्यांनी या विषयावर निवेदन केले तरीही राज्यातील अनेक जिल्हे बंद आहेत. या ज्वालामुखीचा कधी स्फोट होईल, अशी शंका आमच्यासारख्यांच्या मनात आहे.
राज्याच्या कानाकोप-यात ज्या असंख्य सामाजिक संघटना आहेत, ते रस्त्यावर उतरून ज्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत ते या सभागृहापर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे, असेही नितेश राणे म्हणाले.
वेगळा रंग देऊ नये!
कोपर्डीतील घटनेमुळे दोन समाजात निर्माण झालेल्या तणावासंदर्भातील माहिती व त्यासाठी मागील दोन वर्षात या सरकारने निर्माण केलेली पार्श्वभूमी सांगत असताना सत्ताधा-यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
त्यावर राणे म्हणाले की, राज्यात ज्याबद्दल असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे ते शांत कसे करू शकतो, ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो. निवेदनानंतरही लोक शांत होत नसतील तर ठोस भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. तेच सांगण्याचा मी प्रयत्न करताना वेगळा रंग देऊ नये, असेही राणे यांनी सत्ताधा-यांना खडसावले.
गृहराज्यमंत्र्यांच्या गाडीतून फिरतोय मटका किंग
एका बाजूला गृहमंत्र्यांची हीच अवस्था तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री ग्रामीण. सिंधुदुर्ग जिल्ह्याची काय अवस्था आहे? मटका, जुगार, व्हीडिओ पार्लर, गेम पार्लर जोरात सुरू आहे. गेल्या दोन वर्षात गृहराज्यमंत्र्यांनी सर्टिफिकेट दिले तसे चालू आहे.
गृहराज्यमंत्र्यांच्या हक्काचा कार्यकर्ता आमदार म्हणून त्यांचेच पत्र, प्रशासनाला धाक दाखवून गेम पार्लर शाळेच्या जवळ सुरू करतोय. गृहराज्यमंत्री सर्व मटकाकिंगला सिंधुदुर्गात येऊन आपल्या गाडीत घेऊन फिरतात. जर अशी परिस्थिती असेल तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा, असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला.
केवळ निवेदन चालणार नाही. त्यातून धाक निर्माण झाला पाहिजे व या झालेल्या चर्चेतून राज्याचे वातावरण बदलले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.