निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीची शिक्षा कायम राहाणार असल्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला.
नवी दिल्ली- निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीची शिक्षा कायम राहाणार असल्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे देशभरातून निर्भयाला न्याय मिळाल्याचा भावना व्यक्त होत आहेत.
देशाला हादरवून टाकणा-या १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी होणार असल्याने संपूर्ण देशाचे या निर्णयाकडे लक्ष लागून होते.
न्यायमुर्ती दिपक मिश्रा, आर. भानुमती आणि अशोक भुषण यांच्या खंडपीठाने यांनी या प्रकरणी निकाल सुनावला आणि संपूर्ण न्यायालयात टाळ्यांचा कडकडाट झाला.
दोषींनी केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. ते दयेच्या लायक नाहीत, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले.
१६ डिसेंबर २०१२ रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर अत्यंत निर्घृणपणे सामूहिक बलात्कार करुन तिला गाडीतून बाहेर फेकले होते. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी अल्पवयीन आरोपीची तीन वर्षानंतर सुटका करण्यात आली तर एका आरोपीने खटला सुरु असताना आत्महत्या केली.
समाजाला संदेश देण्यासाठी तुम्ही कोणाला फाशी देऊ शकत नाही; आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. समाजाला संदेश देण्यासाठी कोणाला फाशी दिली जाऊ शकत नाही. यामुळे मानवी हक्कांच्या चिंधडय़ा उडाल्या आहेत, असे आरोपींचे वकील ए.पी. सिंग यांनी म्हटले. ‘हम यहॉ तारोकी उम्मीद लेकर आये थे, पर हमे अंधेरा मिला’, अशी टिप्पणी सिंग यांनी केली. या प्रकरणात बिलकूल न्याय झालेला नाही. शिक्षा ही सुधारणा होण्यासाठी असते. गांधींजींना अपेक्षित असलेल्या अहिंसेच्या तत्त्वाला यामुळे हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाच्या निकालाची संपूर्ण प्रत वाचून फेरविचार याचिका दाखल करू, असे सिंग यांनी म्हटले.
निर्भया प्रकरणाचा घटनाक्रम
१६ डिसेंबर २०१२ : दिल्लीच्या मुनिरकामद्ये ६ जणांनी एका बसमध्ये पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करुन तरुणीला आणि तिच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिले.
१८ डिसेंबर २०१२ : राम सिंह, विनय शर्मा, मुकेश आणि पवन गुप्ता यांना या प्रकरणी अटक करण्यात आली.
२१ डिसेंबर २०१२ : या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला दिल्लीमधून आणि सहावा आरोपी अक्षय ठाकूरला बिहारमधून अटक करण्यात आली.
२९ डिसेंबर २०१२ : निर्भयाला उपचारासाठी सिंगापूरच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने प्राण सोडले.
३ जानेवारी २०१३ : पोलिसांनी ५ आरोपींविरोधात हत्या, गँगरेप, हत्येचा प्रयत्न, अपहरण, चोरी इत्यादी आरोपांतर्गत चार्जशीट दाखल केले.
१७ जानेवारी २०१३ : फास्ट ट्रॅक न्यायालयाने ५ आरोपींवर आरोप निश्चित केले.
११ मार्च २०१३ : आरोपी राम सिंहची तिहार जेलमध्ये आत्महत्या.
३१ ऑक्टोबर २०१३ : बालगुन्हेगारी न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला गँगरेप आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवत ३ वर्षांसाठी त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.
१० सप्टेंबर २०१३ : फास्ट ट्रॅक न्यायालयाने इतर चार आरोपींना १३ गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले.
१३ सप्टेंबर २०१३ : दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला फाशीची शिक्षा ठोठावली.
१३ मार्च २०१४ : दिल्ली उच्च न्यायालयाने चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
२०१४-२०१६ : दोषी आरोपींनी फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
५ मे २०१७ : सर्वोच्च न्यायालयाकडून चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम