मागील दीड वर्षापासून रत्नागिरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी लक्ष दिले नाही.
रत्नागिरी- मागील दीड वर्षापासून रत्नागिरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी लक्ष दिले नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव होऊनही प्रदेशाध्यक्षांना जाग येत नसेल तर अशा कमिटीमध्ये आणि अशा नेतृत्वाखाली मला काम करायचं नाही, अशी भूमिका मांडून रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा मंगळवारी राजीनामा दिला.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कारभारावर थेट टीका करतानाच केवळ रत्नागिरीलाच जिल्हाध्यक्षपद न देण्यामागे काहीतरी राजकीय वास येत असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेचे जिल्ह्यातही पडसाद उमटले. चिपळूणसह लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापुरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या या भूमिकेला समर्थन देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला.
मंगळवारी दुपारी मुंबई येथून काँग्रेसचे युवा नेते निलेश राणे यांनी पत्राद्वार प्रदेशाध्यक्षांसमोर आपली परखड भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्षांच्या रत्नागिरी जिल्ह्याबाबतच्या सापत्न भूमिकेवरही त्यांनी थेट टीका केली. त्यामध्ये निलेश राणे म्हणतात, मागील दीड वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्याला अध्यक्ष देण्यासाठी आम्ही आपल्याला प्रत्यक्षरित्या भेटून, पत्रव्यवहार करून निवेदन देऊनही आपण दुर्लक्ष केल्याची टीका या पत्रात करण्यात आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे काही पक्षाला नुकसान झाले त्याचे प्रमुख कारण जिल्ह्याला अध्यक्ष नाही हेच होते.
ज्या पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही अशा पक्षाला आम्ही मतदान का करावे अशी मतदारांची भूमिका होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट, भाजपा- सेनेचे नियोजन आणि सरकारी यंत्रणा प्रतिस्पर्धी पक्षाकडे असल्याने आपल्या पक्षाला फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची स्थिती बिकट आहे. आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढा आम्ही सर्वाना एकत्र घेऊन पक्ष टीकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. पण असे असले तरी संघटनत्मक पातळीवर जिल्हाध्यक्ष पद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
ग्रामीण भागात या पदाला मोठा मान असतो. हे आपणास माहित असूनही आपण हा विषय गांभीर्याने हाताळला नाहीत म्हणून सरचिटणीस या नात्याने तुमच्या सोबत काम करणे शक्य नसल्याचे श्री. राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना या पत्राद्वारे कळविले आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या कारभाराबाबत मत मांडताना श्री. राणे यांनी पत्रात म्हंटले की प्रदेशाध्यक्ष असूनही एका जिल्ह्याला अध्यक्षपद देऊ शकत नसाल तर अशा कारभाराचा आपल्याला वाटेकरी व्हायचे नाही. लोकसेवा आणि लोकहितासाठी आम्ही समाजसेवेमध्ये आलो असून कोणत्याही पदासाठी किंवा पक्षाकडून काहीही मिळावे यासाठी नाही. पक्षाकडे आम्ही कधी काही मागितले नाही तरीही तुम्ही निर्णय देत नसाल आणि तुमच्या पदाचा वापर हा फक्त तुमच्यासाठीच करत असाल तर भविष्यामध्ये अजून दयनिय परिस्थिती काँग्रेस पक्षाची होईल असे पत्रामध्ये श्री. राणे यांनी नमूद केले आहे.
पक्षाच्या अशा परिस्थितीमध्ये जर सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांला तुम्ही बळ देऊ शकत नाही तर अशा प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये राहणे मला शक्य होणार नाही आणि या पदाचाही अपमान होईल. जिल्ह्याला प्रभारी देऊन त्याला जिल्ह्याचा कारभार समजत नसतो आणि जिल्ह्याची संघटना बदलत नसते किंवा वाढत नसते याची जाणीव तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याकडे बघून झाली पाहिजे. या जिल्ह्यात माझा लोकसभा मतदार संघ असून त्यामध्ये पाच तालुके समाविष्ट आहेत.
येथून आपल्याला निवडणूक लढवायची आहे असे सांगूनही तुम्ही योग्य पद भरत नसाल तर त्यामध्ये एक वेगळा राजकीय वास येत असल्याचेही श्री. राणे यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे. आपण जर योग्य भूमिका घ्याल तर चांगली कार्यकर्ते पक्षात येतील आणि पक्षासाठी चांगले काम करतील, असे स्पष्ट केले आहे.
परंतू हिच भूमिका राहिल्यास ग्रामपंचायत निवडणुकीलाही तिकीट मागण्यासाठी लोक येणार नाहीत. पक्षाबाबत वारंवार सांगूनही अशीच भूमिका तुम्ही घेत असाल तर अजून किती नुकसान तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याच करणार आहात हेच आम्हाला आता बघायचं आहे असा टोलाही निलेश राणे यांनी प्रदेशाध्यक्षांना लगावला आहे. मात्र राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेस पक्षाचेच काम करत राहणार असल्याचेही त्यांनी या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.
निलेश राणे यांच्या या राजीमान्याचे तीव्र पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले. निलेश राणे यांनी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांचीच भूमिका या पत्राद्वारे मांडल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून यावेळी उमटल्या. श्री. राणे यांनी घेतलेल्या या भूमिकेच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला असून आपापल्या पदांचेही राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळेजिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीत तीव्र पडसाद; सामूहिक राजीनाम्याचा इशारा
रत्नागिरी- तब्बल दीड र्वष जिल्हाध्यक्ष न नेमल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा मंगळवारी राजीनामा दिला.
या निर्णयामागे तालुका काँग्रेससह सेलचे सर्व पदाधिकारी निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची प्रदेश काँग्रेसने येत्या दोन दिवसांत दखल न घेतल्यास आम्हीही सामूहिक राजीनामे देऊ अशी भूमिका रत्नागिरी तालुका काँग्रेसच्या पदाधिका-यांनी घेतली आहे. ही भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्याबाबतच्या दुजाभावावरही त्यांनी सडकून टीका केली.
यावेळी रत्नागिरी काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, महिला प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस रूपाली सावंत, महिला प्रदेशच्या सल्लागार अॅड. अश्विनी आगाशे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सचिन आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, अल्पसंख्याक सेलचे कोकण विभागाचे समन्वयक रशिद साखरकर, अशोक वाडेकर, संकेत चवंडे, शोएब खान, अमित देसाई, नंदू चव्हाण, युवक काँग्रेसचे अमर शेठ, एनएसयुआयचे तन्मय सावंत, सोशल मिडियाचे रत्नागिरीचे अध्यक्ष साहिल साटम, रवी खेडेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा संघटक इर्शाद काझी, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हुसेन फोंडू, शिवाजी कारेकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पदाधिका-यांनी भूमिका मांडताना सांगितले की, गेले दोन वष्रे जिल्हाध्यक्षांचे पद रिक्त आहे. या दरम्यान नगरपरिषद आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाही पार पडल्या. मात्र तरीही जिल्हाध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला गेला नाही. या निवडणुका आम्ही माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या तरीही जिल्हाध्यक्ष असणे पक्षासाठी आवश्यक आहे.
आजही काँग्रेसचे मतदार ग्रामीण भागामध्ये आहेत मात्र जिल्हाध्यक्षच नसल्याने त्याचे मोठे नुकसान पक्षाला होत आहे. या पक्षाच्या स्थितीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणच जबाबदार असून अध्यक्ष नसल्याचे जिल्ह्याची कार्यकारीणीच कार्यरत झाली नसल्याचे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र तरीही प्रदेशाध्यक्ष जिल्ह्याला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप पदाधिका-यांनी यावेळी केला.
निलेश राणे यांनी घेतलेली ही भूमिका योग्यच असून याबाबत प्रदेशाध्यक्षांनी येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय द्यावा अन्यथा आम्ही सामुहिक राजीनामे देऊ अशी स्पष्ट भूमिका या पदाधिका-यांनी यावेळी स्पष्ट केली.