संपूर्ण जगाने २०१६ या वर्षाला निरोप दिला. नव्या वर्षाचा सूर्य उगवला. भारतासह संपूर्ण जगाने नव्या वर्षातील नव्या किरणांचे स्वागत केले. याचा आनंद आपण शहरी माणसं मोठया उत्साहाने साजरा करीत असलो, त्यासाठी मोठमोठया पाटर्य़ाचे आयोजन करीत असलो, तरी आजही काही लोकांना कधी नवीन वर्ष आले आणि कधी निघून गेले याच्याशी संबंध नाही.
नव्या वर्षातील नव्या जगाचा उजेड अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. वर्षामागून अशी र्वष जात आहेत, काळ सरत आहे, मात्र त्यांच्या जीवनात कोणताही फरक पडताना दिसत नाही. ही परिस्थिती कुठे दूरची नाही, तर या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांच्या वेशीवरच ती पाहायला मिळते. काल पुन्हा त्या जगात जाण्याचा योग आला.
मुंबईलगत असलेल्या वाडा, मोखाडा, शहापूर, जव्हार या तालुक्याच्या दुर्गम भागात आपण जाऊन पाहिले तर इथले लोक अजून जगाच्या किती मागे आहेत हे दिसून येते. डोंगर-द-यात राहणा-या आदिवासींना माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणा-या प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. राज्य सरकारने स्वतंत्र आदिवासी मंत्रालय केले, त्याच्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली, तरीही तेथील जीवनमान फारसे बदललेले नाही. काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात झालेल्या बालमृत्यूने आपल्याला अस्वस्थ केले होते.
इतक्या सर्व योजना, निधी असताना येथील परिस्थिती का सुधारत नाही. याचे कारण काय असेल तर आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशी परिस्थिती आहे. या लोकांना केवळ अन्न-धान्य, कपडेलत्ते देऊन हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत या भागात चांगल्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार नाहीत, त्यांना चांगले शिक्षण मिळणार नाही, ते लिहू-वाचू लागणार नाहीत, तोपर्यंत त्यांची नव्या जगाशी ओळख होणार नाही.
आता या गोष्टी केवळ सरकारवर सोपवून समाजातील विचारी लोकांना स्वस्थ बसता येणार नाही, तर आपण या समाजाचे काही देणे लागतो म्हणून काही प्रयत्न करावे लागतील. तसे प्रयत्न काही लोक करू लागले आहेत. वेगवेगळया पातळय़ांवर काम करीत आहेत. असाच प्रयत्न करणा-यांपैकी ‘राशी फाऊंडेशन’ नावाची एक संस्था आहे. आपल्यापरीने आदिवासी भागातील जीवनमान सुधारण्यासाठी या संस्थेचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाचा साक्षीदार होण्याची संधी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मिळाली.
जुने वर्ष सरत आले होते आणि नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी वेगवेगळे लोक आपल्या कुवतीप्रमाणे करीत होते. कुणी कोणत्या पर्यटनस्थळी कुटुंबासोबत जाण्याचा बेत आखत होते, तर कुणी इथे मुंबईलगतच्या काही रिसॉर्टवर मौजमस्ती करण्याची तयारी करीत होते. मात्र त्याचवेळी राजेंद्र भोसले या तरुणाच्या नेतृत्वाखाली ‘राशी फाऊंडेशन’चे तरुण मात्र आदिवासी भागात ज्ञानाची किरणे घेऊन जाण्यासाठी योजना आखत होते.
आदिवासी भागातील शाळांमध्ये वाचनालय सुरू करून तेथील विद्यार्थ्यांपर्यंत जगाची ज्ञानाची कवाडे उघडी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गेल्या आठवडयात राजेंद्र भोसले यांच्याकडून हा उपक्रम कळाला. ३१ डिसेंबर रोजी शहापूर तालुक्यातील शेरे आणि शेई या दोन शाळेत वाचनालय सुरू करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा चांगल्या उपक्रमात आपलाही सहभाग असावा म्हणून या उपक्रमासाठी ५० पुस्तकांचा संच देत असतानाच वाचनालयाच्या उद्घाटनाला जाण्याचे ठरविले.
सकाळी राजेंद्र भोसले पुस्तके घेण्यासाठी आले, तेव्हा त्यांच्याच गाडीतून वाचनालयाच्या उद्घाटनाला जाताना त्यांच्या या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली. ते म्हणाले की, ‘ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रंजना उघडा यांच्यासोबत आदिवासी भागातील काही गावांत जाण्याचा योग आला. मोबाईल, कॉम्प्युटरच्या माध्यमातून जग आपल्या मुठीत आले असले तरी आदिवासी भागातील जनता ही या नव्या जगापासून कित्येक मैल दूर आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यात शिक्षण वाढविले पाहिजे, शालेय शिक्षणाबरोबरच इतर ज्ञान तेथील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. त्यासाठी वाचनालय हा एक प्रयत्न ठरू शकतो, असे वाटले आणि त्यातूनच ‘गाव तेथे वाचनालय’ ही संकल्पना आमच्या डोक्यात आली.
ही संकल्पना मी आमच्या ‘राशी फाऊंडेशन’चे विश्वस्त शिल्पा सुर्वे, दिनकर जाधव, अभिजित मिरजकर, मीनल रावराणे, शरद माळी यांच्यासमोर मांडली. ती संकल्पना सर्वानाच आवडली. मग आम्ही पहिल्यांदा या भागातील विद्यार्थ्यांना सहज समजतील अशा पुस्तकांची यादी केली. सुरुवातील स्वत:च्याच खिशातून पहिले वाचनालय गेल्या महिन्यात सुरू केले.
त्यानंतर ३१ डिसेंबरच्या निमित्ताने काही दानशुरांकडून सहकार्य घेऊन इतर गावांमध्ये वाचनालय सुरू करण्याचे ठरविले. रंजना उघडा यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आदिवासी भागात काम केलेले असल्याने कोणत्या गावात वाचनालय सुरू केल्यास उपयुक्त ठरू शकेल याची माहिती घेतली. त्यातून शेई आणि शेरे या गावाची निवड केली आहे,’ अशी माहिती भोसले यांनी प्रवासादरम्यान दिली.
शेरे येथील शाळेत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पोहोचलो. पहिली ते चौथीपर्यंतची ही शाळा होती. आपल्यासाठी कुणी तरी पुस्तके घेऊन आले आहे, याचा आनंद त्या मुलांच्या चेह-यांवर दिसत होता. त्यांनी रानातील झाडांची जशी मिळाली तशी फुले आणि फुलांचे घोश तोडून आणले होते. शहरातील पुष्पगुच्छांना सजविण्यासाठी वेगवेगळी बेगडं वापरली जातात. कारण इथलं जगणच बेगडी असतं. त्या निरागस मुलांकडून कोणताही बेगडीपणा नसलेले स्वागत स्वीकारताना वेगळेच समाधान वाटले.
तेथील शिक्षकांनाही आपण कर्तव्य म्हणून शिकवितो, मात्र या भागातील मुलांना ज्ञान मिळावे यासाठी कुणी तरी प्रयत्न करीत आहे, याचे खूप समाधान वाटले. त्यानंतर आम्ही शेई या गावी गेलो. ही शाळा पाचवी ते दहावीपर्यंतची होती. या शाळेत आजूबाजूच्या दहा किलोमीटर परिसरातून मुले येतात. कधी एसटीची बस मिळते. कधी चुकते. बस चुकू नये म्हणून आम्ही कार्यक्रम थोडा घाईत उकरण्याचा प्रयत्न करीत होतो.
मात्र तेथील विद्यार्थ्यांचा उत्साह, वाचण्याची, ऐकण्याची उत्सुकता पाहून कार्यक्रम काही काळ लांबला. मुलांनी परतीचा प्रवास पायी करण्याची तयारी दर्शविली. शहरातून आलेली माणसे पुस्तके देत आहेत, परंतु तेथील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शेई शाळेचे मुख्याध्यापक लच्छाणेसर यांनी मुलांसाठी योजना जाहीर केली की, वाचलेल्या पुस्तकांवर दर महिन्याला मुलांचे अनुभव कथन घेतले जाईल आणि चांगल्या कथन करणा-याला बक्षीस दिले जाईल.
एकंदरच सर्वाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. दरी-डोंगरात राहणा-या, ज्ञान मिळविण्याची इच्छा असतानाही त्यापासून दुरवलेल्या या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम खूपच मोलाचा वाटला. दुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनमानात सुधारणा घडविण्यासाठी उचललेले हे पाऊल खूपच महत्त्वाचे वाटले. अर्थात हा प्रयत्न पुरेसा आहे, असे नाही. ही एकटी संस्था त्यासाठी पुरेशी आहे असेही नाही. आता शहरी भागात राहणा-या लोकांनीच सरकारवर सर्व भार घालून स्वस्थ बसण्यापेक्षा आपल्याकडे असलेला ज्ञानाचा उजेड या दुर्गम भागापर्यंत पोहोचविला पाहिजे. चला तर मग थोडा उजेड वाटूया!