रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली.
पुणे- रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. पुण्यात बुधवार पेठेतील वात्सल्य मॅटर्निटी होममध्ये ही घटना घडली. या प्रकरणी डॉक्टरांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयेंद्र कदम आणि स्वाती कदम या दाम्पत्याला मुलगी झाली. विजयेंद्र हा रिक्षाचालक आहे.
स्वाती कदमला मुलगी झाल्यानंतर त्या मुलीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी इन्क्युबेटरमधील तापमान वाढल्यामुळे बाळ ८० टक्के भाजले. या बाळावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. मात्र बुधवारी सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाला.
मंगळवारी स्फोटासारखा आवाज येऊन मशिनमधून धूर आल्याचा दावा कदम कुटुंबीयांनी केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे इन्क्युबेटर ओव्हरहिट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
याप्रकरणी वात्सल्य रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. गौरव चोपडे आणि त्यांच्या कर्मचा-यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयात पहिल्यांदाच अशाप्रकारचा अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे वॉर्मर तापले, मात्र रुग्णालयाकडून कोणतीही हलगर्जी नव्हती, असा दावा डॉ. गौरव चोपडेंनी केला.