आधी क्रिकेटपटू, मग टेलिव्हिजनवर मनोरंजनाचे कार्यक्रम आणि त्यानंतर राजकारणात सक्रिय आणि आता आमदारकीसह मंत्रीपद मिळालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपली बोलंदाजी सुरूच ठेवली आहे.
चंदीगड- आधी क्रिकेटपटू, मग टेलिव्हिजनवर मनोरंजनाचे कार्यक्रम आणि त्यानंतर राजकारणात सक्रिय आणि आता आमदारकीसह मंत्रीपद मिळालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपली बोलंदाजी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे आता सर्वाधिक प्राधान्य कोणत्या गोष्टीला देणार, याचे उत्तर त्यांनी त्यांच्या बेधडक शैलीत सांगून टाकले आहे. आता आपण दिवसा राजकारण आणि रात्री कॉमेडी शोचे रेकॉडिंग करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान, सिद्धू यांच्या या निर्णयावर त्यांच्याच पक्षातून टीका सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार के. टी. एस. तुलसी यांनी तर सिद्धू यांनी मंत्रीपद किंवा टीव्ही शो दोहोंपैकी एकाची निवड केली पाहिजे. जनतेने तुम्हाला निवडून दिलंय. त्यामुळे जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे, या मुद्दय़ावर सिद्धू यांना न्यायालयात खेचण्याचा विचारही तुलसी करत असल्याचं समजतं.
आज मंत्री झालो असलो तरी, आपण कोणत्याही परिस्थितीत कॉमेडी शो सोडणार नाही. या शोमुळे मंत्री म्हणून माझ्या कामावर काहीही परिणाम होणार नाही. हवं तर रात्री कॉमेडी शोचे रेकॉर्डिग करेन आणि दिवसा माझ्या कार्यालयात येऊन जनतेची सेवा करेन. हे सगळं मॅनेज करणं तारेवरची कसरत जरूर आहे. पण मी ते करेन. पण पंजाबच्या प्रगतीला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.