परळ रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीमुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.
नवी मुंबई- परळ रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीमुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा विचार केल्यास स्थानके उभारतानाच दाखवण्यात आलेल्या दूरदृष्टीमुळे पुढील किमान २५ वर्षे तरी ही स्थानके वाढत्या गर्दीसाठी पुरेशी ठरणार असल्याचे स्पष्ट होते.
सिडको व रेल्वेच्या भागीदारीतून या नियोजनबद्ध स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. एकवीसाव्या शतकातील सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. नवी मुंबई १९९२ मध्ये हार्बर रेल्वेने मुंबईशी जोडली गेली. सर्वात प्रथम मानखुर्द ते वाशी रेल्वे सुरू झाली. रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर नवी मुंबई वेगाने विकसित झाली. वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स, बेलापूर, खारघर, मानसरोवर, पनवेलपर्यंत टप्प्याटप्प्याने रेल्वेमार्ग विकसित करण्यात आला.
आज नवी मुंबईतून लाखो प्रवासी मुंबईला जातात. त्याचप्रमाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोलीमार्गे हे शहर ठाणे शहराला जोडले गेले आहे.स्थानकांचा विकास करताना भविष्यातील वाढती प्रवासीसंख्या विचारात घेण्यात आली होती. मुंबईत रेल्वे मार्गावरील अरुंद पूल व प्रचंड गर्दी याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे नवी मुंबईत विस्तीर्ण फलाट आणि दोन ते तीन भुयारी मार्ग बांधण्यात आले. त्यामुळे एकमेकांच्या बाजूला असलेल्या दोन्ही फलाटांवर गाडी आली तरी प्रशस्त जिन्यांमुळे प्रवाशांचा लोंढा सहज स्थानकाबाहेर पडतो.
विविध स्थानकांमध्ये असलेल्या भुयारी मार्गाची रुंदी मोठी असल्याने दोन्ही दिशेने मोठय़ा संख्येने प्रवाशी एकत्र आले तरी सहजरीत्या त्यांना बाहेर पडता येते. नऊ डब्यांची रेल्वे १२ डब्यांची झाली तरी नवी मुंबईतील योग्य नियोजनामुळे प्रवासी स्थानकाबाहेर पडण्यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण आली नाही.
स्थानकांतून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी प्रशस्त जागा आहे. त्यामुळे मुंबईतील स्थानकांप्रमाणे येथे प्रवाशांना बस थांबा किंवा रिक्षा थांबा गाठण्यासाठी अडथळा शर्यत पार करावी लागत नाही. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत नवी मुंबईतील रेल्वे स्थानके सुटसुटीत आहेत. सीवूड्स हे शहरातील सर्वात मोठे व देखणे स्थानक आहे. नेरूळ-उरण या नव्याने सुरू होणा-या मार्गावरही भागीदारीतून देखणी स्थानके बांधली जाणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहर अधिकच चांगले वाटणार आहे.
[EPSB]
लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करण्याऐवजी लोकपाल कायदा कमकुवत करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत असल्याचा आरोप करतानाच लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी सोमवारी, २ ऑक्टोबरला दिल्ली येथे राजघाटावर आंदोलन करण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धीत बोलताना जाहीर केले.
[/EPSB]