पंतप्रधान मोदी नक्राश्रू ढाळू नका, दलितांवर अत्याचारांवर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी लोकसभेत केली.
नवी दिल्ली- दलितांवर अत्याचार करू नका, तुम्हाला मारायचे असल्यास मला मारा, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. पंतप्रधान मोदी नक्राश्रू ढाळू नका, दलितांवर अत्याचारांवर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी लोकसभेत केली.
लोकसभेत शून्याच्या तासात काँग्रेसच्या खासदारांनी दलितांवर होणा-या अत्याचारांबाबत आपले मौन सोडावे. त्यांनी केवळ ट्विटरवर बोलू नये, अशी मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी केली. या प्रश्नी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलण्यास लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी सभागृह दणाणून सोडले. काँग्रेसने नेते ‘वेल’मध्ये उतरून त्यांनी घोषणाबाजी केली. दलितांवर होणा-या अत्याचारावर पंतप्रधानांनी सभागृहात येऊन आपले मत मांडावे, अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी नक्राश्रू ढाळू नयेत. त्यांनी केवळ टिव्ट करू नये. त्यांनी दलितांवर कारवाई करणा-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या खासदारांनी केली.
शून्य तास संपल्यानंतर आपण खर्गे यांना बोलण्यास परवानगी देऊ, असे लोकसभा अध्यक्ष महाजन यांनी जाहीर केले. या विषयावर बोलण्यास आपणास नोटीस दिलेली नाही. तरीही काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले होते. लोकसभा अध्यक्ष महाजन काँग्रेस खासदारांना सतत जागेवर जाण्याच्या सूचना करत होत्या. लोकसभेत अनेक लहान पक्ष आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडण्यास देणे गरजेचे आहे. ते न केल्यास त्यांच्यावर अन्याय होईल, असे महाजन यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी ‘नौंटकी’ करणे बंद करावे -दिग्विजय सिंह
दलितांच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी नौटंकी बंद करावी, तसेच आक्षेपार्ह विधाने करणा-यांना आवरावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केले. संसदेबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. तेलंगणात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा समाचार घेताना सिंह म्हणाले की, ‘दलितांना मारू नका, मला गोळ्या घाला’ ही पंतप्रधानांची भाषा अगतिकतेची आहे. पंतप्रधानांना ही भाषा शोभत नाही. पंतप्रधानाने अशी भाषा वापरणे हे असहाय्यपणाचे लक्षण आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना संसदेच्या बाहेर अशी वक्तव्ये करणे योग्य नाही. तुम्ही वसुधैव कुटुंबकमची भाषा करता. ज्यावेळी दादरीत अखलाक शेखचा बळी जातो त्यावेळी गप्प का बसता,असा सवाल सिंह यांनी केला. गुजरातमधील उना येथे दलितांना बेदम मारहाण झाल्यानंतर तुम्ही त्याच्याविरोधात कारवाई केली नाही. भाजपाच्या राज्यात अनेक संघटना दलितांवर अन्याय करत आहेत. या संघटनांना सरकारी पाठबळ मिळते, अशी टीका त्यांनी केली. झारखंडमध्ये एका मुस्लिम मुलाला ठार केले. त्यावेळी तुम्ही काय केले. कुठे गेली तुमची ‘वसुधैव कुटुंबकम’ची भाषा? त्यामुळेच ही नौटंकी थांबवा, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘रामजादे-हरामजादे’ वक्तव्य करणारे, मोदींना विरोध करणा-यांनी पाकिस्तानात जावे, जे गोमांस खातात त्यांनी पाकिस्तानात जावे आदी बेछूट वक्तव्य करणा-यांना मोदींनी रोखावे. जर तुम्हाला त्यांना रोखता येत नसल्यास तुम्ही पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी सिंह यांनी केली.
[EPSB]
मला गोळ्या घाला, मात्र दलितांना मारू नका
‘तुम्हाला मारायचे असल्यास तुम्ही मला गोळ्या घाला, मात्र दलितांना मारू नका, ’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
[/EPSB]