महानगरपालिकेचा कारभार कसा असतो हे न कळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्धवटराव आहेत, असा घाणाघाती हल्ला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चढविला.
मुंबई- अच्छे दिन येणार, नोटाबंदीनंतर ५० दिवसांत कारभार सुरळीत होणार, अशा थापा मारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे आहेत, तर महानगरपालिकेचा कारभार कसा असतो हे न कळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्धवटराव आहेत, असा घाणाघाती हल्ला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चढविला. मुंबई महापालिकेच्या कारभारावर बोलणा-या मुख्यमंत्र्यांनी नागपूर महापालिकेत नंदलाल चौकशीने काय ठपका ठेवला होता, हेही सांगावे असेही ठाकरे म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंड येथे शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. त्याला उद्धव ठाकरे यांनी मालाड येथील सभेत सडेतोड उत्तर दिले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी रोज नव्या थापा मारत आहेत.
अच्छे दिन येणार म्हणाले, अच्छे दिन अजून आले नाहीत. नोटाबंदीनंतर ५० दिवसांत कारभार सुरळीत होईल म्हणाले, अजून कारभार सुरळीत झाला नाही. आता त्यांच्या खोटारडेपणावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. भाजपालाही हे आता पटले आहे. म्हणून मोदींच्या फोटोऐवजी भाजपाने स्टॅम्पपेपरवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
मोदी रोज उठले की देश बदल रहा है। असे सांगतात. आम्हाला तर काही बदललेला दिसत नाही. मग आमच्या लक्षात आले की, ते रोज वेगळय़ा देशात जातात. म्हणून त्यांना देश बदललेला दिसतो, असा टोलाही त्यांनी लगावला.