संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचे आभाराचे भाषण झाले होते.
नवी दिल्ली- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचे आभाराचे भाषण झाले होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर अनेक मुद्दयांवरून हल्लाबोल केला होता.
यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभाराचे भाषण केले, मात्र यात त्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली. यावेळी पंतप्रधानांची बोलण्याची शैली पाहून त्यांची पद्धत अतिशय उद्धट आणि गर्विष्ठपणाची होती, अशी टीका काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांनी केली आहे.
तसेच त्यांच्या या उत्तराला सभागृहाने मान्यता देताना काँग्रेसने सभात्याग केला. पंतप्रधानांकडे त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे व्हिजन मांडण्याची चांगली संधी होती, मात्र त्यांनी ती गमावली, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. नोटाबंदीमुळे देशातील सर्वसामान्यांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला असून देशातील १२५ जणांचा बळी गेला आहे. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून त्यांनी देशाची माफी मागावी, असे खरगे म्हणाले होते. तर सरकारच्या अनेक योजनाही फक्त नावापुरत्याच असल्याचा आरोप करत सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत असल्याचे ते म्हणाले होते.
याला प्रत्युत्तर देताना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत जोरदार टोलेबाजी केली. नोटाबंदीची वेळ योग्यच होती, हा पूर्ण अभ्यास करून घेतलेला निर्णय होता, त्यामुळे मोदी घाईघाईने निर्णय घेतात, असे विरोधकांनी समजू नये, असे मोदी म्हणाले. या निर्णयाने सर्वसामान्यांना सुरुवातीचे काही दिवस त्रास झाला हे मान्य आहे, मात्र हा निर्णय सर्वसामान्यांसाठीच घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर नोटाबंदीचे नियम १०५ वेळा बदलल्यावरून टीका करणा-या काँग्रेसला तुम्ही मनरेगाचे नियम १०३५ वेळा बदलले होते, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
परदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा परत आणण्यासाठीही काँग्रेसने ६५ वष्रे सत्ता उपभोगताना काहीही केले नसल्याचा आरोप मोदी यांनी केला. त्यांच्या या प्रत्युत्तरानंतर काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला. तसेच स्वत:चे आणि पक्षाचे व्हिजन मांडण्याऐवजी पंतप्रधानांनी उद्धटपणे आणि गर्विष्ठपणे उत्तर दिले, अशी टीका केली. तर ‘अच्छा भाषण देनेसे अच्छे दिन वापस नहीं आते!’ असे म्हणत काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही पंतप्रधानांवर टीका केली. यावर पुन्हा चर्चा होणार असून त्यावेळी काँग्रेसला पुन्हा बोलण्याची संधी मिळणारच आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला सूचक इशाराही दिला.