विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत.
मुंबई- विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपांवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तात्काळ काढावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर निवडणूक होणाऱ्या औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण आणि नाशिक या पाच विभागांत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे परवानग्या घेऊन लावलेले फलक काढले आहेत. आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही; मात्र या नियमानुसार सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक या पाचही विभागांतील सर्व पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत.
सर्व राजकीय पक्षांसाठी एकच नियम आहे. या नियमानुसार, प्रशासनाने विरोधी पक्षांच्या नेत्यांचे सर्व फलक काढले आहेत; मात्र सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती या पाचही विभागांतील पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत, ते तात्काळ काढून घ्याव्यात, असे सावंत म्हणाले.
या सोबतच महाराष्ट्र सरकारकडून राज्य परिवहन विभागाची बस स्थानके, एसटी बसेस, रेल्वे स्थानके तसेच विविध महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसेसवर सरकारी जाहिराती लावलेल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती काढून टाकव्यात, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.