नोटाबंदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ५० दिवसांची मुदत संपल्यामुळे सरकारने आता बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध ताबडतोब उठवावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली.
मुंबई- नोटाबंदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ५० दिवसांची मुदत संपल्यामुळे सरकारने आता बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध ताबडतोब उठवावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली. नियोजनाअभावी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. याच्या निषेधार्थ २ जानेवारी २०१७पासून काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन करणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले. नोटाबंदीबाबत शिवसेना खरोखरच गंभीर असेल, तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.
काँग्रेस गांधीभवन कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. नोटाबंदीसाठी केंद्र सरकारने दिलेली सर्व कारणे चुकीची ठरली आहेत. ज्या दिवशी नोटाबंदीचा निर्णय झाला, त्याच दिवशी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या अखत्यारीतील एका बँकेत ५०० कोटींच्या जुन्या नोटा कशा भरण्यात आल्या, असा सवालही चव्हाण यांनी केला.
नव्या चलनातील नोटा सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडूनच मोठया प्रमाणात जप्त झाल्या, याकडे लक्ष वेधताना उद्योगधंद्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अनेक उद्योगांनी कामगार कपात केली याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले.
हे सरकार कर्जबुडव्यांना ७१ हजार कोटींची माफी देते. हे सरकार प्रत्यक्षात कोणाचे आहे, असा आरोप करत रांगेत उभे असताना जे शंभर बळी गेले त्यांच्याबाबतही सरकार असंवेदनशील असल्याचा बोचरी टीका चव्हाण यांनी केली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या शैलीची खिल्ली भाजपा उडविते. पण त्यांनी सरकारला विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे मात्र देत नाही. नरेंद्र आणि देवेंद्रांच्या राज्यात लोकांना मात्र दारिद्रय़ आले, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल समाधान व्यक्त करताना पुढील निवडणुका सुरळीत पार पडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसशी मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्याबाबतचा निर्णय स्थानिक स्तरावर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी नव्हतीच, प्रासंगिक करार होता, असे उत्तर चव्हाण यांनी एका प्रश्नाला दिले.