मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरलेली जनता मोदी सरकारला रस्त्यावर आणेल, असे परखड मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी येथे व्यक्त केले.
मुंबई- नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. मोदी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. तसेच नोटाबंदीचा निर्णय म्हणजे मोदींनी केलेला गुन्हा आहे, असे आरोप करत याप्रकरणी मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरलेली जनता मोदी सरकारला रस्त्यावर आणेल, असे परखड मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी येथे व्यक्त केले. काँग्रेसतर्फे सोमवारी देशभर पाळण्यात आलेल्या जन आक्रोश दिनानिमित्त मोर्चा काढण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या निर्णयाविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी देशभर ‘जन आक्रोश दिन’ पाळण्यात आला. यानिमित्ताने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कलिना ते वांद्रे खेरवाडी जंक्शन असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. खेरवाडी जंक्शनजवळ या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यात राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. त्याचबरोबर विविध संघटना, संस्था आणि जनतेचा याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या वेळी निरुपम म्हणाले, या मोर्चात जे लोक उपस्थित आहेत, ते काळा पैसा करणारे नाहीत. ही सर्व सरकारच्या नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयाने त्रस्त झालेली सर्वसामान्य जनता आहे. सरकारविरोधात आक्रोश करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले होते. जनधन योजनेच्या नावाखाली प्रत्येक नागरिकाचे बँक खाते उघडून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याची थापसुद्धा मारली होती.
विदेशी बँकांमध्ये असलेला करोडो रुपयांचा काळा पैसा भारतात आणण्याचेही आश्वासन दिले होते. पण यातील एक गोष्ट त्यांनी केलेली नाही. रिझव्र्ह बँकेची महिन्याला ३०० कोटी रुपयांच्या नोटा छापण्याची क्षमता आहे. त्यामुळे या त्रासमुक्तीसाठी सात महिने लागणार आहेत. त्यामुळे ही निव्वळ दिशाभूल आहे. हा निर्णय म्हणजे मोदींनी केलेला गुन्हा आहे यासाठी मोदींनी जाहीर माफी मागावी. नाहीतर रस्त्यावर उतरलेली जनता या सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असे निरुपम यांनी येथे ठणकावले.