मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. त्यांच्या भाषेने राजकारणाचा स्तर घसरला आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जोरदारपणे मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करीत आहेत.
भाजपा इतकी वाईट आहे, तुम्ही त्यांना शिव्या देता तर मग त्यांच्यासोबत सत्तेत कसे काय बसता? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी विचारला आहे. शिवसेना सत्तेला चटावलेली असल्याने काहीही झाले तरी सत्ता सोडणार नाही, असेही राणे म्हणाले.
झी २४ तास या वृत्तवाहिणीच्या ‘रोखठोक’ कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपाच्या आपसातील भांडणावर जोरदार ‘प्रहार’ करीत असतानाच काँग्रेस पक्षांमध्येही काही सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीही शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका करीत होते.
निवडणुकीनंतर पुन्हा ते एकत्र आले. आताही ते तशीच टीका करीत आहेत. यावर आपली काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला असता, नारायण राणे म्हणाले की, ‘‘ज्या तऱ्हेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर टीका करीत आहेत, ती त्यांना शोभण्यासारखी नाही.
राजकारणात वैचारिक मतभेद जरूर असतात, असलेही पाहिजेत. परंतु टीका करीत असताना ती वैयक्तिक पातळीवर असू नये. शिवसेना-भाजपाचे नेते कितीही एकमेकांवर टीका करीत असले तरी हे लोकांच्या हितासाठी करीत नाहीत, तर सत्तेसाठी करीत आहेत हे लोकांनी ओळखले आहे.
सत्तेसाठी पैसा आणि पैशांसाठी सत्ता यासाठीच या दोन्ही पक्षांची धडपड चालली आहे. शिवसेना-भाजपाच्या भांडणाशी सर्वसामान्य नागरिकांचा काहीही संबंध नाही, असे राणे म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचार करीत असताना कोणते प्रचाराचे मुद्दे घेतले पाहिजेत आणि शिवसेना-भाजपाचे लोक कोणत्या मुद्दय़ावर बोलत आहेत. ते शहराच्या विकासावर बोलत आहेत का? ते आरोग्य सेवेबद्दल बोलत आहेत का? शहराचा चेहरा बदलण्याची भाषा करीत आहेत का? विकासाच्या मुद्दय़ावर एकही शब्द दोन्ही पक्षांकडून काढला जात नाही.
कुणी कुणाला कौरव म्हणतो तर कुणी आणखी काही शब्द वापरतो, हे प्रचाराचे मुद्देच कसे होऊ शकतात, असा सवालही राणे यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कितीही भाजपावर टीका करीत असली तरी सत्तेतून बाहेर पडणार नाही. वाघाला रक्ताची चटक लागावी तशी यांना सत्तेची चटक लागली आहे. त्यामुळे कितीही सत्ता सोडण्याच्या धमक्या शिवसेनेने दिल्या तरी त्यात काहीही तथ्य नाही.
उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ती क्षमता नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये ती धमक होती. आज शिवसेनाप्रमुख असते तर एका क्षणाचाही विलंब न करता सत्तेतून बाहेर पडले असते, असे नारायण राणे यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीकडून पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. अशा प्रकारचा मुद्दा ते उपस्थितच कसे काय करू शकतात? महापालिकेच्या सत्तेत गेली २२ वर्षे तुम्हीसुद्धा भागीदार आहात.
स्थायी समितीमध्ये जे प्रस्ताव पास झाले ते तुमच्या संमतीशिवाय झाले काय? मुंबई महापालिकेत काही चुकीचे घडले असेल तर त्याला जितकी शिवसेना जबाबदार आहे, तितकाच भाजपासुद्धा जबाबदार आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेतील घोटाळयांबद्दल बोलण्याचा भाजपाला अधिकारच नाही, असे सांगून नारायण राणे म्हणाले की, बावीस वर्षे मुंबईत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. काय अवस्था केली आहे मुंबईची? याच काळात जगातील इतर शहरांचा कसा विकास झाला. सिंगापूर, कौलालंपूर ही शहरे आज जागतिक पर्यटन हब म्हणून नावारूपाला आली आहेत.
त्याउलट मुंबईची काय अवस्था आहे? इथले रस्ते नीट नाहीत. स्वच्छ पाणी पिण्यासाठी नाही. ज्या पवई तलावातून मुंबईकरांना पाणी पुरविले जाते, तिथे जाऊन पाहिले तरी कुणीही पाणी पिण्याचे धाडस करणार नाही, असेही ते म्हणाले. मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक येथे निवडणूक तिकीट वाटपा दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ज्या तक्रारी कानावर आल्या त्या अत्यंत गंभीर आहेत.
१३० वर्षाच्या पक्षात अशा घटना घडणे योग्य नाही. २०१९ च्या निवडणुका जिंकायच्या असतील तर काँग्रेस पक्षातही काही बदल करण्याची गरज आहे आणि त्याबाबत आपण पक्ष श्रेष्ठींशी बोललो असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले.
आजपासून धडाडणार नारायण राणे यांची प्रचार तोफ
मुंबईसह १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारात नारायण राणे संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून शिवसेना-भाजपाच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करणार आहेत. झी २४ तासवरील ‘रोखठोक’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
काँग्रेस म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे काँग्रेस, असे गेल्या काही वर्षात समीकरण झाले आहे. असे असताना यावेळी तुम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारापासून दूर कसे, असा सवाल विचारला असता नारायण राणे म्हणाले, ‘‘तुम्ही कालची माहिती देत आहात.
कालच काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे माझ्याशी बोलणे झाले. त्यांनी सांगितले की, आपण निवडणुकीच्या प्रचारात उतरले पाहिजे. त्याचबरोबर मुंबई आणि राज्यातील ज्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते भेटत आहेत.
प्रचार करण्यासाठी विनंती करीत आहेत. त्याशिवाय सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात जो दर्जा घसरला आहे, हे पाहता मला घरात बसणे योग्य वाटत नाही. म्हणूनच मी प्रचारात उतरणार आहे. शिवसेना-भाजपाच्या सर्व कारभाराचा आपण पंचनामा करणार आहोत, असेही नारायण राणे यांनी सांगितले.
आता खासदार होण्याची इच्छा!
महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढी पदे आहेत, जवळपास सर्वच्या सर्व पदांवर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. नगरसेवक, बेस्ट समितीचा अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा मंत्री या सर्व पदांवर काम केले आहे. त्या दृष्टीने मी खूप भाग्यवान आहे. मागच्याच विधानसभेच्या वेळी निवडणूक न लढविण्याचा निर्णय मी घेतला होता.
राजकारणात खूप दगदग केली. आता थोडं आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यावे, असे मी ठरविले होते. मात्र तत्कालीन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पक्षासाठी निवडणूक लढावी, अशी विनंती केली म्हणून मी लढलो. महाराष्ट्राच्या राजकारणात जे करायचे ते करून दाखविले आहे.
विरोधी पक्षनेता म्हणून तर एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आता यापुढे राज्याच्या राजकाणापेक्षा संसदेत काम करण्याची इच्छा आहे. ज्या संसदेत देशाचे राजकारण चालते, जिथे बॅरिस्टर नाथ पै सारख्यांनी काम केले, तेथे जाण्याचा विचार आहे, असे नारायण राणे म्हणाले.