राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेऊन एसीबी आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा, अशी दणदणीत मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत केली.
मुंबई- राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेऊन एसीबी आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा, अशी दणदणीत मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत केली.
महिला बालकल्याणमंत्री सामाजिक न्याय, आदिवासी विकास, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण, गृहनिर्माण, अन्न नागरी पुरवठा अशा सुमारे डझनभर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुरावे सादर करून धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारचे वाभाडे काढले.
भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांना जो न्याय लावला तोच न्याय या भ्रष्ट मंत्र्यांना का लावत नाही, असा सवालही त्यांनी विचारला.
राज्यात भ्रष्टाचार नाही, असे खाते दाखवा, असा तडाखेबंद हल्ला करून नारायण राणे म्हणाले की, मुंबई महापालिकेसारखा भ्रष्टाचार तर देशात कुठे नाही.. नियम २६० अन्वये विधान परिषदेत झालेल्या चर्चेत जुन्या मंत्र्यांचे घोटाळे आणि नव्याने सामील झालेल्या मंत्र्यांचे घोटाळे सादर करून श्री. धनंजय मुंडे यांनी चर्चेला सुरुवात केली.
‘न खाऊंगा न खाणे दुंगा’ म्हणणा-या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे भ्रष्टाचार एवढे आहेत. वर्षभरापूर्वी चिक्की घोटाळयाचे पुरावे दिले, अनेक पत्रं पाठवली, पत्राची पोहोचसुद्धा सरकारने दिली नाही आणि परस्पर क्लीनचिट दिली जात असेल तर समिती नेमता कशाला? असे पंकजा मुंडे यांच्या चिक्की घोटाळा चौकशीबाबत मुंडे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागात २९७ कोटींच्या औषध खरेदी घोटाळयासाठी नेमलेली भगवान सहाय समिती नेमके काय करीत आहे? छोटया अधिका-यांना बळी दिले. बडया अधिका-यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. डाळ घोटाळयाचे कवित्व अजून चालूच आहे. ९० रुपये किलोने रेशनवर मिळणारी डाळ १२० रुपये किलोने विकण्यामागे कोणाचे हितसंबंध मंत्री जपत आहेत.
रेनकोट खरेदी घोटाळा मंत्र्यांचे सचिव नातेवाइकांना हाताशी धरून करीत आहेत. रवींद्र वायकर यांचा घोटाळा स्वत:च्या अनोंदणीकृत जमिनीसाठी पदाचा दुरुपयोग केल्याची कागदपत्रे मुंडे यांनी रवींद्र वायकर यांच्या आरोपासंदर्भात सादर केली. मुख्यमंत्री क्लीनचिट देत असल्यामुळे तपास यंत्रणेवर दबाव येत आहे, असाही हल्ला त्यांनी केला.
या चर्चेत भाग घेताना ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी सांगितले की, भाजपाची नितीमत्ता फसवी आहे. एकही खाते भ्रष्टाचारमुक्त नाही. मुंबई महापालिका तर सर्वात भ्रष्ट आहे. म्हाडा, एसआरए, नगरविकास या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेसारखा भ्रष्टाचार तर या देशात कुठेही नाही.
श्री. राणे आणि मुंडे यांच्या घणाघाती हल्ल्यामुळे आज सरकारचे वाभाडे निघाले. जे भाजपाचे लोक नीतीमत्तेचा डांगोरा पिटत होते तेच आज नीतीमत्ता हरवून बसले आहेत. पारदर्शक कारभार देऊ, अशी आश्वासने जाहिराती काढून दिली गेली. कारभारात कुठेही पारदर्शकता नाही.
भ्रष्ट मंत्र्यांची नावे घेऊ सांगता आणि वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवर त्यांची नावे येतात, त्यांना जाब विचारता का? जे मंत्री दोषी असतील त्यांना घरी पाठवा. दोषी नसतील तर ठेवा. मी मुख्यमंत्री असताना शोभाताई फडणवीस यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांच्यावर कारवाई?केली होती. याची आठवण देऊन नारायण राणे म्हणाले, रामाच्या नावावर सत्ता मिळवली, पण सत्तेत राम नाही.
एकनाथ खडसेंचा जमीन घोटाळा झाला असे उद्योगमंत्रीच सांगतात, मग त्यांना क्लीनचिट कशी दिली? असाही सवाल नारायण राणे यांनी केला. पोषण आहारात घोटाळा, औषध खरेदीत घोटाळा, कोणत्या खात्यात भ्रष्टाचार नाही ते सांगा? लोकांना रडवून पैसे कमवता.
मराठी माणसांना कोणता न्याय दिलात? असा प्रश्न विचारून नारायण राणे म्हणाले की, मराठी माणूस आज वसई-विरार, कल्याणच्या पुढे गेलेला आहे. परळच्या बोगदा चाळीतील मराठी माणसांना बेघर केले. वायकर यांच्या दोन इमारती तिथे आहेत. त्याची माहिती पुढे देईन. सेना-भाजपाचे नेते केवळ तोंडाने टीका करतात आणि कार्यकर्ते डोकी फोडून घेतात. नेत्यांचा स्वार्थ त्यांना दिसत नाही.
तुमची सत्ता जावी म्हणून आम्ही हे आरोप करत नाही. पण सत्तेचा वापर लोकांसाठी करा. भ्रष्ट मंत्र्यांना सोडाल तर आम्ही न्यायालयात दाद मागू.. तिथे कोण सोडवणार आहे त्यांना? असाही सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे ती जनतेला दिसायला पाहिजे. कायदा-सुव्यवस्थेसाठी आम्ही सहकार्य करू. माझी भावना समजून घ्या. महाराष्ट्राची ख्याती वाढवा.
हक्कभंग ठराव कशासाठी?
नारायण राणे यांच्यावर काही सदस्यांनी सभापतींकडे दिलेल्या हक्कभंग ठरावाचा उल्लेख करून नारायण राणे म्हणाले की, भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी हक्कभंगाची भाषा केली जात आहे. १२३ कोटींचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे चालले आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. कोणत्याही मंत्र्याचे काम प्रभावी नाही, राज्यातील सगळे रस्ते उखडले आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
मुख्यमंत्र्यांच्याच नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील इमामपाडा परिसरात १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून दोन नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी गुरुवारी विधान परिषदेत माहितीच्या मुद्दयाद्वारे दिली.
२० जुलै रोजी इमामपाडयात १२ वर्षाची मुलगी शिकवणीकरिता जात असताना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. आजही ती मुलगी दहशतीखाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारला निवेदनाचे आदेश दिले.