महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा ‘एनडीए’चा घटक पक्ष असून येत्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
मुंबई- महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा ‘एनडीए’चा घटक पक्ष असून येत्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. मंत्रिमंडळ विस्तार करीत असताना काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आपल्या ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची अहमदाबाद येथे भेट झाली. त्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे वृत्त होते.
त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार होणार का आणि झाला तर त्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांचा समावेश असणार का, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा आता ‘एनडीए’चा घटक पक्ष आहे. त्यामुळे जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा नारायण राणे यांना मंत्रिमंडळात सामावून
घेण्याबाबत नक्कीच विचार करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकूण जागांपैकी ५५ टक्के यश आले आहे. विरोधी पक्षांच्या वतीने चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल करण्यात येत आहे. लवकरच आम्ही मुंबईत सरपंचांची परिषद घेणार असून त्यावेळी राज्यातील किती ग्रामपंचायती भाजपसोबत आहेत, हे दिसून येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईत नगरसेवकांच्या झालेल्या फोडाफोडीबाबत किरीट सोमय्या यांनी तपास यंत्रणांकडे आपली तक्रार दिली आहे. त्याप्रमाणे तपास होईल. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी ‘त्यांच्या’ जीवावर नव्हे, तर जनतेच्या भरवशावर महाराष्ट्रात फिरत असतो.
छोटय़ाशा राजकीय फायद्यासाठी त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सोशल मिडियावर फेक अकाऊंट काढून राज्यातील सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांवर नक्कीच कारवाई केली जाईल. पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी केवळ मोदी विरोधात पोस्ट टाकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, गेले दोन महिने ही व्यक्ती सरकार विरोधात प्रचार करीत होती. एक-दोन नव्हे त्याच्या २०० वादग्रस्त पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नांदेडमधील पराभवाचा मित्रांना जास्त आनंद!
नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला विजय म्हणजे सर्व विषयात नापास व्हावे आणि चित्रकलेच्या पेपरमध्ये ८० टक्के मार्क मिळवावेत, असा प्रकार आहे. तिथे आमच्या झालेल्या पराभवाचा आनंद काँग्रेस पेक्षाही आमचा मित्र पक्ष असलेली शिवसेना जास्त साजरा करीत आहे. खरे तर ते अकारा जागांवरून एका जागेवर कसे आले याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. भाजपला तिथे जास्त जागा मिळाल्या नसल्या तरी आमची टक्केवारी ३ टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांवर पोहोचली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
[EPSB]
[/EPSB]