गणेशोत्सव झाल्यानंतर भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, आमदार नारायण राणे यांनी दिला आहे.
पुणे- महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर धारेवर धरले होते. आता गणेशोत्सव झाल्यानंतर भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, आमदार नारायण राणे यांनी शनिवारी येथे दिला. गोरक्षण कायद्याचा आधार घेऊन देशात घडणारे प्रकार असंवेदनशील आणि असहिष्णुतेचे द्योतक आहे, अशी टीका त्यांनी केली.
पुणे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित करण्यासाठी नारायण राणे हे पुण्यात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे घडली आहेत. त्याबाबत आम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरले होते. त्याबाबतचे पुरावेही सभागृहात मांडले. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आता शेतीमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न आणि मंत्र्यांचे भ्रष्टाचार या विरोधात गणेशोत्सव झाल्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा राणे यांनी दिला. देशात गोरक्षणाच्या नावाने जो उच्छाद सुरू आहे, त्याबाबत बोलताना राणे म्हणाले की, युतीच्या सरकारमध्ये मी पशुसंवर्धन मंत्री होतो. तेव्हा गोवंश हत्या बंदीचे विधेयक आणले होते. तेव्हा ते पास झाले होते. युतीच्या राज्यात झालेले ते विधेयक मला मान्य नव्हते. या कायद्याचा आधार घेऊन देशात जे घडत आहे ते असंवेदनशील आणि असहिष्णुतेचे द्योतक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्यात वस्तू व सेवा विधेयक (जीएसटी) लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेची जकात रद्द होणार आहे. त्यामुळे ८ हजार कोटींचे नुकसान होणार आहे. ते नुकसान कसे भरून काढणार? महाराष्ट्र प्रगत राज्य असल्याने आपला खर्च जास्त आहे. त्यामुळे आपल्याला जास्त निधी मिळायला हवा. उत्पन्नाच्या पन्नास टक्के निधी आपल्याला मिळणार असेल तरच ते परवडेल, अशा शब्दांत त्यांनी जीएसटी विधेयकावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
दहीहंडी उत्सवादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जे निर्बंध आले ते टाळता आले असते. याबाबत सरकार जागरूक असते तर त्याबाबत कायदा करता आला असता. दहीहंडी उत्सवाची तारीख ठरलेली होती. परंतु सरकार गाफील राहिल्यामुळे त्यांनी कायदा केला नाही. सरकारने कायदा केला असता तर लोकांना कायदा मोडावा लागला नसता, असेही राणे म्हणाले.
तत्पूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणे म्हणाले की, पुण्याला उज्ज्वल परंपरा आहे. या शहरात काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार निवडून आले. पालकमंत्री झाले. देशाला नेतृत्व दिले. मात्र आज काँग्रेसचा एकही आमदार पुण्यातील नाही, याबद्दल आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जयजयकाराच्या घोषणा केवळ दाखविण्यासाठी आहेत की काँग्रेसला बळकट करण्यासाठी आहेत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. काँग्रेसचा पाया भक्कम आहे. परंतु सध्याची पक्षाची अवस्था पाहवत नाही. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर प्रत्येकाने एकदिलाने कामाला लागले पाहिजे. आताची लढाई ही तलवारीने नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लढविली जात आहे. यासाठी संयमित पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करावा, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य पक्षातर्फे केले जाईल. सर्व जण एकदिलाने काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्न करून पुण्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून आणूया, असे आवाहनही राणे यांनी केले.