देशात सध्या अराजकता वाढली आहे. दुर्दैवाने ही अराजकता वाढवण्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांचा सहभाग असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
नांदेड- देशात सध्या अराजकता वाढली आहे. दुर्दैवाने ही अराजकता वाढवण्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांचा सहभाग असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ रविवारी रात्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्या वेळी हाळदा येथे ते बोलत होते. आपल्या भाषणात चव्हाण यांनी सेना-भाजपावर सडकून टीका केली. भाजपा व शिवसेना एकमेकावर आरोप करतात.
मुख्यमंत्री शिवसेनेची औकात दाखवतो म्हणतात. उद्धव ठाकरे खिशात राजीनामे असल्याची भाषा करतात. याचा अर्थ दोघेही सत्तेचा मलिदा लाटून ‘आधा तुम्हारा, आधा हमारा’ हे सूत्र ठेवतात. शिवसेना, भाजपा हे दोन्ही पक्ष ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ स्पर्धेप्रमाणे निवडणूक लढवत आहेत.
पंतप्रधानांच्या सभेत माझी खुर्ची मोदींच्या बाजूला ठेवा, असे सांगण्याची केविलवाणी स्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. केंद्र आणि राज्यातील नरेंद्र आणि देवेंद्र या दोघांनी सामान्य माणसाच्या नशिबी दारिद्रय़ आणले आहे. राज्यात युतीच्या काळात तब्बल नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. राज्यातील शेतक-यांनी केलेल्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे.
शेतक-यांचे प्रश्न या सरकारने जाणून घेतले नाहीत. त्यांनी उद्योगपती मल्ल्याचे कर्ज माफ केले; परंतु शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी मात्र हे सरकार योग्यवेळेची वाट पाहात आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
हाळदा हे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या मतदार संघातील गाव असल्याने त्यांनी चिखलीकरांवरही जोरदार टीकास्त्र सोडले. दहा पक्ष बदलणारा आमदार असा उल्लेख करून त्यांची निष्ठा तपासावी लागेल, असेही चव्हाण म्हणाले.