आणखी दोन महिन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतली तीन वर्षे पूर्ण करतील. आतापर्यंत त्यांनी एक हाती किल्ला लढवला. पण पुढील काळ त्यांना यापेक्षा बिकट संकटांचा जाणार आहे. असंतुष्टांची खदखद वाढत आहे. भाजपमध्ये प्रतिभेचा दुष्काळ असताना मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार कसा करतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पक्षाला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हटले जाते. पण अलीकडे या ‘सोवळ्या’ पार्टीतील ‘डिफरन्सेस’ भडभडा बाहेर येऊ लागले आहेत. आता केवळ शिवसेना बोलत नाही तर भाजपमधलेच लोक बोलू लागले आहेत. परमेश्वर कसा आहे? हे कुणीही पाहिले नाही. पण त्याच्याबद्दलच्या सुरस कथा उदंड आहेत. भाजपच्या देवघरात बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही प्रतिमा सुपरगॉडपेक्षा कमी नाही. मोदींच्या महानतेची आरती लहान-मोठे नेते ओवाळत आले आहेत. स्वत:भोवती विणलेल्या गूढ कोशात मोदी गेली तीन वर्षे वावरत आले आहेत. जनतेपुढेच काय, पत्रकारांपुढेही जाण्याचे ते टाळतात. सारे मंत्री मोदींना घाबरतात असे आपण आतापर्यंत ऐकत होतो. पण कुणी उघड बोलत नव्हते. प्रथमच कुणी मोठा फटाका लावला आणि तो भाजपचा बालेकिल्ला विदर्भातून लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुस-या क्रमांकाचे बॉस खा. प्रफुल्ल पटेल यांना हरवणारे भंडा-याचे खासदार नाना पटोले यांनी नुकताच मोदींच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. ‘खासदारांच्या बैठकीत मी शेतक-यांचा विषय मांडला तर मोदी माझ्यावर चिडले. मोदींना ऐकून घेण्याची सवय नाही. प्रतिप्रश्न विचारलेले त्यांना आवडत नाही. चिडतात. त्यामुळे खासदारांवर भीतीचे सावट आहे’ अशा शब्दात नाना पटोले यांनी नागपुरातल्या एका कार्यक्रमात शरसंधान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी सोडले नाही. ‘पुढारी मुंबईला गेला की, त्यांची मानसिकता बदलते’ अशा शब्दांत त्यांनी खदखद व्यक्तकेली. नानांनी दिलेल्या धक्क्यातून पक्ष सावरत नाही तोच भाजपचेच नागपूर जिल्ह्यातले काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी ही योग्य वेळ असल्याच्या शुभेच्छा दिल्याने फडणवीस यांच्या तंबूत खळबळ उडाली.
पटोले असोत की, आशीष देशमुख, हे नेते बोलायचे म्हणून बोललेले नाहीत. भाजपमध्ये सारे आलबेल नाही, असंतोषाच्या ढिगा-यावर भाजप बसला आहे, याचे हे संकेत आहेत. मोदींशी पंगा घेऊन पटोले आपले उपद्रवमूल्य वाढवू पाहात आहेत. तसे असेल तर त्यांना भाजप समजलाच नाही, असे म्हणावे लागेल. पटोलेंच्या वक्तव्यावर भाजपच्या एकाही नेत्याने तोंड उघडले नाही. त्यांचे विधान खोडूनही काढले नाही. खुद्द नितीन गडकरींनी चुप्पी साधली. चिरेबंदी शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणा-या भाजपमध्ये विरोधात बोलणा-याचा ‘एकनाथ खडसे’ केला जातो. शत्रुघ्न सिन्हांची अवस्था देश पाहतो आहे. वापरून झाल्यावर फेकून देण्याची संघ परिवाराची कामाची स्टाइल आहे. बलराज मधोक यांचे हेच झाले. विरोधात बोलणा-यांना माफी नसते. महादेव शिवणकर, गुडधे पाटील या सारख्यांनीही ते भोगले आहे. ‘माझा अडवाणी झालाय’ असे नाथाभाऊने म्हटलेच आहे. पण नाना छातीला माती लावून उतरलेले दिसतात. अस्वस्थ नानांनी स्वगृही जाण्याची तयारी चालवली आहे. ते काही साधूसंत नाहीत. त्यांना त्यांचे राजकारण करायचे आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे राजकारण वेगळे आहे. प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव या जिल्ह्यांच्या राजकारणावर राहात आला आहे. मोदी लाटेत पटेलांना लोळवून पटोले ‘जायंट किलर’ बनले खरे. पण कबूल करूनही मंत्रीपद मिळत नाही, ही त्यांची बैचेनी आहे. आता तर प्रफुल्लभाईंचा मोदींशी दोस्ताना वाढला आहे. पुढच्या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळेलच याची नानांना खात्री नाही आणि मिळालेच तर पटेल-मोदी आपला गेम करतील अशी सुप्त भीती आहे. त्यामुळे ते संधीच्या शोधात आहेत. शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेस सोडून पटोले भाजपमध्ये आले होते. आता ते वेगळा विचार करू शकतात. काँग्रेसकडे तशीही उमेदवारांची वानवा आहे. मतदारांचा आजच भरवसा देता येत नाही. कारण पूर्वीसारखी लाट नसली तरी लोकांनी अजून तरी मोदींना पूर्णपणे ‘रिजेक्ट’ केलेले नाही.
लोकसभा निवडणुकीला आणखी एक वर्ष आठ महिने वेळ आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी असंतुष्टांची खदखद वाढेल. ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे?’ असा सवाल समर्थ रामदास स्वामींनी केला होता. खरेच भाजपमध्ये कोण सुखी आहे? मुख्यमंत्री फडणवीस तरी सुखी आहेत का? पहिल्या दिवसापासून शिवसेना त्यांना छळते आहे. सत्तेत येऊनही विरोधी पक्षासारखी वागत आहे. ताज्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर ‘एनडीए मेली’ अशी प्रतिक्रिया सेनेकडून आली. तुम्ही लिहून ठेवा. पुढच्या निवडणुकीत भाजपचा मुख्य शत्रू शिवसेना असेल. उद्याच्या शत्रूसोबत काही महिने संसार करायची बळजबरी भाजपला सोसावी लागत आहे. पटोले बोलून मोकळे झाले. मुख्यमंत्र्यांना बोलायची सोय नाही. हसतमुखाने ते असंतुष्टांची आदळआपट सहन करीत आहेत. २०१४ मध्ये जे घटक भाजपसोबत होते ते बहुतेक सारे नाराज आहेत.
खा.राजू शेट्टी आपली स्वाभिमानी शेतकरी संघटना घेऊन सरकारबाहेर पडले आहेत. सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे, रामदास आठवले यांच्या हाती काही ना काही चॉकलेट दिले असल्याने ते भाजपसोबत आहेत. पण समाजाचा, आरक्षणाचा विषय पुढे जात नसल्याने या नेत्यांचे समर्थक आतून नाराज आहेत. बहुजन समाजाकडे नेतृत्व नाही म्हणून सुरुवातीपासून भाजपमध्येच खदखद आहे. ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल’ असे म्हणताना पंकजा मुंडेंपासून अनेकांना गुदगुल्या होतात. म्हणूनच परवा आमदार आशीष देशमुखांनी पंकजा मुंडेंना, ‘तुम्ही मुख्यमंत्री व्हा’ अशा शुभेच्छा दिल्या तेव्हा पंकजांनी त्यांना फटकारले नाही. मुख्यमंत्री शुभेच्छांवर नव्हे तर हायकमांडच्या कृपेवर ठरतो, हे साधे गणित न कळण्याएवढे हे राजकारणी निर्बुद्ध नाहीत. तरीही सीएमपदाची चर्चा उकरून काढली जाते. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपमधल्या एका गटाला फडणवीस नको आहेत. स्वत:चे उपद्रवमूल्य दाखवू पाहणारी ही मंडळी घोटाळ्यात अडकल्याने फडणवीसांवरच त्यांना वाचवायची वेळ आली तो भाग वेगळा. पण ती खुमखुमी अजून गेलेली नाही. मुख्यमंत्री केंद्रात जातील आणि इथे चंद्रकांतदादा पाटील यांना बसवले जाईल, अशी हवा भाजपमधूनच पेरण्यात आली होती, हे आता बाहेर आले आहे.
बाहेरच्या आणि घरातल्या विरोधकांवर मात करून मुख्यमंत्री फडणवीस येत्या ३१ ऑक्टोबरला सत्तेतली तीन वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीला दाद दिली पाहिजे. ५८ मराठा मोर्चे, शेतक-यांचे प्रश्न, दुष्काळ, सेनेची डोकेदुखी पचवून फडणवीस मजबुतीने उभे आहेत. म्हणायला ४० मंत्री आहेत. पण दोन-चार सोडले तर काही कामाचे नाहीत. २०-२० तास काम करून मुख्यमंत्री एकटय़ाने ही सर्कस चालवत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात एक ब्राह्मण मुख्यमंत्री तीन वर्षे पूर्ण करतो हा चमत्कार आहे. मोदींचा विश्वास कमावणे ही साधी गोष्ट नाही, फडणवीस यांनी तो कमावला आणि त्या जोरावरच ते टिकले. तीन वर्षात त्यांच्यावर एक डाग नाही. उलट सहका-यांचे डाग धुण्याची कसरत त्यांना करावी लागली. महापालिका, जिल्हा परिषदा जिंकवून देणारा मुख्यमंत्री म्हणून इतिहास फडणवीस यांची नोंद घेईल. शरद पवारांनाही एवढे जमले नव्हते. राज्यात विरोधी पक्ष आहे की नाही अशी शंका यावी अशी सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाच्या नाजूक नसा दाबून नाकेबंदी केली. पण पुढची दोन वर्षे खतरनाक आहेत. शेतक-यांना कर्जमाफी जाहीर करून चार महिने झाले. पण शेतक-यांच्या हातात अजून एक छदाम पडलेला नाही. पुढच्या महिन्यात राज्यात ग्रामपंचायत निवडणुका आहेत. थेट पद्धतीने सरपंच निवडला जाणार आहे.
शेतक-यांची राजीनाराजी या निवडणुकीतून लक्षात येणार आहे. मोदींनी आपले मंत्रिमंडळ वाढवल्याने महाराष्ट्रातही विस्ताराचे वेध लागले आहेत. एकेका मंत्र्याकडे दोन-चार खाती आहेत, मंडळे, महामंडळेही रिकामी आहेत. विस्तार करायचाच झाला तर तो दिवाळीच्या तोंडावर होईल. पण मग भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांचे काय करायचे? हा मोठा प्रश्न आहे. खडसे एक वर्षापासून बाहेर आहेत. आता प्रकाश मेहता, सुभाष देसाई यांनाही वगळले तर सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतो. विष्णू सावरा, राजकुमार बडोले फार आधीपासून हिट लिस्टवर आहेत. पण नापास मंत्र्यांना काढून शेवटी घेणार कुणाला? भाजपमध्ये प्रतिभावान आमदारांचा दुष्काळ आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा वेळी समीकरणे बिघडवणे शहाणपणाचे नसते. त्यामुळे आवश्यकतेपुरता बदल करून मुख्यमंत्री वेळ मारून नेऊ शकतात.