पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडणा-या भाजपच्या खासदार नाना पटोले यांनी कोलांटउडी मारत प्रसार माध्यमातून माझी बदनामी होत असल्याचा खुलासा केला.
गोंदिया- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. त्यामुळे ते खासदारांवर संतापतात, असे म्हणत भाजप खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधानांवरच टीकास्त्र सोडले होते. तसेच पंतप्रधान मोदींच्या बैठकीत शेतीचे वास्तव सांगितले तर मोदी माझ्यावर भडकले. कारण त्यांना असे काही ऐकण्याची सवय नसल्याची टीका पटोले यांनी केली होती. मात्र या वक्तव्यावरून पटोले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत प्रसार माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नेहमीच शेतक-यांच्या प्रश्नाबाबत गंभीर असतात, असा खुलासा केला आहे.
शेतक-यांच्या मुद्द्यावर शासन गंभीर नसल्याची टीका नाना पटोले यांनी नागपूर येथे शुक्रवारी एका कार्यक्रमात केली होती. सोशल मीडिया व वृत्तपत्रातून सुद्धा त्यांचे हे वक्तव्य समोर आले होते. त्यानंतर मात्र नाना पटोले यांनी कोलांटउडी मारत प्रसार माध्यमातून माझी बदनामी होत असल्याचा खुलासा केला.
तसेच पंतप्रधान नेहमी शेतक-यांच्या प्रश्नाबाबत गंभीर असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. केंद्राकडून येणारा निधी हा अपुरा असल्याचे मी बोललो होतो. मात्र मी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्यावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
[EPSB]