बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा २९ ऑगस्ट रोजी मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिकेने परळ, एल्फिन्स्टन, शिवडी आणि आसपासच्या परिसरातील मॅनहोलची शोधमोहीम हाती घेतली आहे.
मुंबई- बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा २९ ऑगस्ट रोजी मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिकेने परळ, एल्फिन्स्टन, शिवडी आणि आसपासच्या परिसरातील मॅनहोलची शोधमोहीम हाती घेतली असून तब्बल १८० पालिका कर्मचा-यांची फौज या कामासाठी सज्ज करण्यात आली आहे. पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी, मलनि:सारण यासह विविध खासगी सेवा उपयोगिता कंपन्यांच्या मॅनहोलमध्ये एकसमानता असावी या दृष्टीने भविष्यात धोरण आखण्याचा विचार या शोधमोहिमेमागे असल्याचे समजते.
मुंबईमध्ये २९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसात अनेक रस्ते जलमय झाले आणि तमाम मुंबईकरांना त्याचा फटका बसला. डॉ. दीपक अमरापूरकर त्या दिवशी घरीच पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली. त्या दिवशी एल्फिन्स्टन जंक्शन परिसरात प्रचंड पाणी साचले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर डॉ. दीपक अमरापूरकर यांची छत्री एल्फिन्स्टन जंक्शन परिसरात सापडली. त्यानंतर काही दिवसांनी वरळी समुद्रकिना-यावर त्यांचा मृतदेह सापडला. पावसाचे पाणी साचल्यामुळे मॅनहोलची झाकणे काढणारे पाचजण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बंदिस्त झाले होते. त्यांनाही पोलिसांनी अटक केली होती.
आता पालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयाने डॉ. दीपक अमरापूरकर दुर्घटनेनंतर परळ, एल्फिन्स्टन, शिवडी आणि आसपासच्या परिसरातील मॅनहोलचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मॅनहोलची स्थिती काय आहे, मॅनहोलवर झाकणे आहेत की नाहीत, त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे का, या दृष्टीने मॅनहोलची पाहणी करण्याचे काम सुरू झाले आहे. पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी, मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे मुंबईत पसरले असून या वाहिन्यांवर मॅनहोल आहेत. त्याशिवाय बेस्ट, रिलायन्स यांसह १२ सेवा उपयोगिता कंपन्यांची मॅनहोल्स मुंबईत आहेत. काही ठिकाणी मॅनहोलवर झाकणेच नाहीत.
काही मॅनहोलवरील झाकणे तुटली आहेत. त्यामुळे पाहणीदरम्यान झाकण नसलेल्या मॅनहोलवर तात्काळ ते बसविण्यात येते. तसेच तुटलेले झाकण बदलण्यात येत आहे. पूर्वी मॅनहोलवरील लोखंडी झाकणे गर्दुल्ले आणि भुरटे चोर चोरत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे.
[EPSB]
महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर अनिवासी भारतीय
भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे अग्रणी नेते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू हे इंग्लंडहून भारतात परत आले होते.
[/EPSB]