मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सर्व तलावांत १६७ दिवस पुरणारा पाणीसाठा जमा झाल्याने महापालिकेने गेल्यावर्षी ऑगस्टपासून मुंबईकरांना लागू केलेली १५ टक्के पाणीकपात अखेर मागे घेतली.
मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सर्व तलावांत १६७ दिवस पुरणारा पाणीसाठा जमा झाल्याने महापालिकेने गेल्यावर्षी ऑगस्टपासून मुंबईकरांना लागू केलेली १५ टक्के पाणीकपात अखेर मागे घेतली. स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने बुधवारी ही पाणीकपात मागे घेत असल्याचे जाहीर केले.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठयातही वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षातील पावसाची सरासरी टक्केवारी ३३ टक्क्यांची आहे.
२००६ ते २०१५ या कालावधीत सरासरी ४८ हजार ३०० कोटी लिटर पाण्याचा साठा जमा झाला होता. त्या तुलनेत या वर्षी ७९,३०५ कोटी लिटर पाण्याचा साठा जमा झाला.
उर्वरित महिन्यांत पावसाची सरासरी कायम राहील, असे गृहीत धरून सध्या चालू असलेली १५ टक्के पाणीकपात मागे घेत असल्याची घोषणा स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी केली आहे.