उल्हासनगरला पाणीपुरवठा करणा-या मोहने बंधा-यावरून पाणी वाहून खाडीत वाया जात आहे.
उल्हासनगर- उल्हासनगरला पाणीपुरवठा करणा-या मोहने बंधा-यावरून पाणी वाहून खाडीत वाया जात आहे. असे असतानाही शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाने घालून दिलेल्या कोठया व्यतिरिक्त हे पाणी उचलण्यास एमआयडीसी तयार नसल्याने उल्हासनगरात पाणीटंचाई कायम आहे. यामुळे मंगळवारचे एमआयडीसीचे शटडाऊन रद्द करून एमआयडीसीने पाणीटंचाईने ग्रासलेल्या शहरवासीयांना दिलासा देण्याची गरज आहे.
उल्हासनगर महापालिकेचा स्वत:चा जलस्रेत नाही. यामुळे एमआयडीसीमार्फत शहराला पाणी पुरवठा केला जातो. यासाठी उल्हास नदीवरच्या मोहने बंधा-यातून एमआयडीसी पाणी उचलते. हया बंधा-यात बारवी धरणातून पाणी येते.
उन्हाळयात बारवी धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे मोहने बंधा-यातून पाणी उचलणारी एमआयडीसी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्टेम प्रधिकरणाला कोठा ठरवून दिला होता. त्यापेक्षा अधिक पाणी उचलल्यास पंप सील करण्यात येतील, अशी नोटीस तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी दिली होती. यामुळे तिन्ही प्रधिकरण ठरविलेल्या कोटयानुसार पाणी उचलत होते.
मागील आठवडयात उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे बारवी धरण ते मोहने बंधारा या प्रवाहादरम्यान पडणा-या पावसामुळे मोहने बंधा-याच्या कठडयावरून पाणी वाहून जात आहे. हे पाणी खाडीमार्गे समुद्रात जात असल्याने एकप्रकारे वाया जात आहे. तर दुस-या बाजूला उल्हासनगर शहरात अद्यापही दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहे. असे असतानाही कोटा ठरवून दिल्यामुळे तिन्ही प्रधिकरण पाणी उचलण्यास कारवाईच्या भीतीमुळे बिचकत आहेत.
एका एमआयडीसीच्या अधिका-याला याबाबत विचारणा केली असता लघुपाटबंधारे विभागाने आदेश दिला नाही तर मंगळवारी शटडाऊन असल्याने पाण्याची उचल बंद ठेवावी लागणार असल्याचे सांगितले.
याबाबत पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगितले की पावसाचे पाणी मोहने बंधा-यावरून जात असल्याने पाण्याची उचल एमआयडीसीने सुरू ठेवावी, यासाठी एमआयडीसी आणि लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी आनंद वसईकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
धाकडे शहाडवासी करीत आहेत नदीची सफाई
दोन महिन्यांपूर्वी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी मोहने बंधा-यातील जलपर्णी हटविण्यासाठी उपोषण सुरू केले होते. या उपोषणानंतर काही प्रमाणात जलपर्णी हटविण्यातही आली होती.
पावसामुळे नदीच्या प्रवाहासह जलपर्णी येऊन मोहने बंधा-यात अडकत आहे. ही जलपर्णी बंधा-यातून काढून टाकण्याचे काम नजीकच्या धाकडे शहाड या गावातील नितीन ढवणे, जगदीश ढवणे, मनीष ढवणे, कैलाश ढवणे, विकास ढवणे, हरेश कोनकर, ज्ञानेश्वर पाटील आदी जण करीत आहेत.