एनडीए सरकारने भ्रष्टाचारविरोधात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला भ्रष्टाचार संपवण्यासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसचा पाठिंबा राहील.
नवी दिल्ली- एनडीए सरकारने भ्रष्टाचारविरोधात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला भ्रष्टाचार संपवण्यासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसचा पाठिंबा राहील. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील अडीच वर्षात फक्त गरिबांचे रक्त शोषले आहे.
८ नोव्हेंबरला मोदींनी काळा पैसा, भ्रष्टाचार संपवण्यासाठी नोटाबंदीचा हा निर्णय घेतला नसून देशातील श्रीमंतांची कर्जे फेडण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सरकारने बडय़ा उद्योगपतींना कर्ज माफ केले. पण शेतक-यांचे कर्ज माफ करण्याबाबत ते काहीच बोलत नाहीत. आम्ही जेव्हा त्यांना शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी भेटायला गेलो, तेव्हाही ते याबद्दल काहीच बोलले नाहीत.
देशातील ५० उद्योगपतींनी सार्वजनिक बँकांचे ८ लाख कोटी रुपयांची कर्ज घेतले आहेत. नरेंद मोदी हे पैसे त्यांच्याकडून घेऊ शकत नाहीत. कारण या उद्योगपतींनीच त्यांना पंतप्रधान बनवले आहे, असे ते म्हणाले.